
स्पर्धा परीक्षांमधून उच्च पदावर जाण्याचे विद्यार्थ्यांना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे आवाहन
रत्नागिरी :विद्यार्थ्यांना मी दैवत मानतो. शिक्षणातूनच चारित्र्याचा विकास घडत सक्षम पिढी घडवण्यात शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण असते. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चिकाटी, महत्त्वकांक्षा असते.आजच्या विद्यार्थ्यांचा बहुतांश कल हा डॉक्टर इंजिनिअर होण्याकडे असतो, ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत, त्यामुळे एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांची कोंकणातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने तयारी करून स्पर्धा परीक्षांत यश मिळवून अधिकारपदाची मोठमोठी पदे संपादित करावीत, असे आवाहन रत्नागिरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी राजाराम म्हात्रे यांनी जाकादेवी येथील केंद्रस्तर व शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात केले.
जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी येथील इयत्ता दहावी बारावी केंद्र स्तर व शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. सदरचा कार्यक्रम शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव विनायक राऊत, कोषाध्यक्ष संदीप कदम, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संचालक किशोर पाटील, संचालक उर्फ आबा पाटील, संचालक रोहित मयेकर, सल्लागार समिती सदस्य नंदकुमार साळवी, नंदकुमार यादव, विलास राणे, निमंत्रण संचालक प्रतिक देसाई, मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर,देऊड शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल्य पुजारी, पोचरीचे मुख्याध्यापक पांडुरंग पानगले,जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, युवा कार्यकर्ते संकेत देसाई, बंटी सुर्वे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांसह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील बक्षीस पात्र गुणवंत विद्यार्थी,पालक ,ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी राजाराम म्हात्रे पुढे बोलतानाम्हणाले की, विद्यार्थी ,युवकांनी छोटी- मोठी कौशल्य आवडीने अवगत करून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. स्वावलंबी बनविण्यासाठी धेय्यवादी आणि सतत प्रयत्नशील असले पाहिजे, अलिकडच्या काळात मोबाईलचा अतिरेक टाळला पाहिजे, वाईट व्यसनांपासून
दूर राहून उतार वयातील वडीलधाऱ्या माणसांचा नेहमीच आदर करा, असे आवाहन त्यांनी केले. उपस्थित प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले.बोर्ड परीक्षेचा सर्वोत्तम निकाल लावलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा बहुमानाची फिरती ढाल देऊन यथोचित गौरव केला.मालगुंड शिक्षण संस्थेच्या देदीप्यमान वाटचालीविषयी त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा शाळा व संस्थेच्या वतीने बंधू मयेकर यांनी सत्कार केला. यावेळी आदर्श विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, कर्मचारी तसेच विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मान्यवर पदाधिकारी यांचे स्वागत मुख्याध्यापक नामदेव वाघमारे यांनी केले. सूत्रसंचलन व आभार सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले. या कार्यक्रमात संस्थेचे संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सीईओ किशोर पाटील, संचालक रोहित मयेकर, संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर यांनीही प्रेरणादायी विचार मांडून गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शन शिक्षकांचे अभिनंदन केले.