
भाजपाचे ३ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण, रास्ता रोको
रत्नागिरी:राज्यात सत्ता असूनही स्थानिक प्रशासन मात्र भाजपाच्या न्याय्य मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्यामुळे भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे. कुवारबाव येथे लोकांनी सार्वजनिक कामासाठी तयार केलेले मैदान अनधिकृत ठरवून ते पाडण्याची तत्परता तहसीलदारांनी दाखवली. परंतु महामार्गावरील अनधिकृत बांधकामे तहसीलदारांना दिसत नाहीत का, असा सवालही भाजपाने केला आहे.
भाजपाने अनधिकृत बांधकांमांबाबत तहसीलदारांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर तहसिलदार (महसूल) यांनी १७ ऑक्टोबरला पत्राद्वारे तहसिलदारांना कळवले होते. परंतु दोन महिने होऊनही त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. परंतु कुवारबावमधील बांधकाम पाडताना तहसीलदार स्वतः उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रीय पक्ष भाजपाचे झेंडे आपण पायदळी तुडविले आहेत. साळवी स्टॉप ते कारवांची वाडी या मार्गावरील बहुतांश अनधिकृत/अतिक्रमण तशीच आहेत. याबाबत वृत्तपत्रांत बातम्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या. परंतु फक्त एकाच बांधकामावर कारवाई करण्यात आली, हे अनाकलनीय आहे. त्यामुळे तहसीलदारांविरोधात उपोषण आणि रास्ता रोको करणार असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. निवेदनाची प्रत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
पाणी योजनेचा दर्जा सुमार?
नवीन नळपाणी योजनेचे काम सुमार दर्जाचे झाले. नळपाणी योजना वारंवार फुटत असुन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यासंदर्भात नागरिकांच्या वतीने भाजपाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन दिले होते. तसेच नगर परिषदेनेही या योजनेत अनियमितता आढळून आल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. भाजपाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर मोर्चा आंदोलन काढून या योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करण्याची मागणी केली होती. पण या आंदोलनाची चेष्टा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली आहे. राज्यात सत्तेमधील असलेली जबाबदार पार्टी असून अशा प्रकारे उत्तरे अपेक्षित नाहीत. एक तांत्रिक तज्ञ संस्था म्हणून आपण शासनाचे दायित्व आपल्याकडे असून आमच्या मागणीप्रमाणे आपण आर्थिक व तांत्रिक लेखापरिक्षण केले असल्यास त्याबाबतची माहिती आपण आम्हाला पुरवणे आवश्यक होते. परंतु ही मागणी गांभीर्याने न घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण व रास्ता रोको करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.