
रत्नागिरी 1 ते 3 डिसेंबर दरम्यान प्रगतिशील साहित्य संमेलनाचे आयोजन
रत्नागिरी :प्रागतिक विचाराधारा आपल्या साहित्यकृतीत आणणार्या लेखक, कवी हे नेहमीच समाजापासून दूर राहिले आहेत, त्यांचे साहित्य व्यापक प्रमाणात समाजासमोर आणण्यासाठी, वाचक संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने पहिल प्रगतिशील साहित्य संमेलनाचे रत्नागिरीमध्ये 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हिंदीतील प्रख्यात कवी कुमार अम्बुज यांच्या हस्ते व डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली याचा शुभारंभ होणार आहे.
रत्नागिरीतील एस.पी. हेगशेट्ये कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स या महाविद्यालयात गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरीची उभारण्यात आली असून, या साहित्यनगरीचे उद्घाटन सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. त्र्यंबक शेजलवकर मुख्य प्रवेशद्वाराचा शुभारंभ प्रमोद मुनघाटे यांच्या हस्ते तर माधव कोंडविलकर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महेंद्र कदम यांच्या हस्ते 1 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती प्रगतिशील लेखक संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष जी. के. ऐनापुरे यांनी दिली. यावेळी अभिजीत हेगशेट्ये, हेमंत वणजू, सिध्दार्थ देवधेकर आदी उपस्थित होते.
तीन दिवस चालणार्या या प्रगतिशील साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमात दोन कवी संमेलने, पाच परिसंवाद होणार आहेत. यामध्ये मराठी समिक्षेची सद्यस्थिती, राजकारणातील नैतिकता, काँम्रेड शरद पाटील समजून घेताना, मुस्लिमांचे बहिष्करण आणि भारतीय लोकशाही, कोकणचे पर्यावरण-साहित्य आणि संघर्ष या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात महराष्ट्रातील नामवंत विचारवंत, समाजसुधारक आपली मते मांडणार आहेत.
या संमेलनामध्ये एका खास दीघार्ंकाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, बाल वर्गासाठी विविध कार्यक्रम, कुमारवयीन मुलांसाठी समांतरपणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. भाषा, लिपी, साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, पर्यावरण अशा विविध घटकांना या साहित्य संमेलनात स्पर्श केला जाणार आहे. प्रागतिक चळवळ वाढवण्याच्या दृष्टीने या साहित्य संमेलनाला महत्व आले आहे.