
हापूस दर वाढीसाठी निर्यात वाढ एकमेव पर्याय
रत्नागिरी :सहकारी संस्था आणि फार्मा प्रोड्युसर कंपन्यांनी एकत्र येऊन हापूसच्या निर्यात केली तर त्यांना निश्चितच अधिक दर मिळेल. तसेच हापूसची निर्यातही वाढेल, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सोपान शिंदे यांनी केले.
येथील अल्पबचत सभागृहात आशियायी विकास बँक अर्थसहाय्यित अॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट), सहकार विकास महामंडळ, कृषी विभाग आणि पणन विभाग आयोजित आंबा उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षणात ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुर्हाडे, उपसंचालक मिलिंद जोशी, एमसीडीसीचे हेमंत जगताप, डॉ. किरण माळशे आदींसह आंबा बागायतदार उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, देशभरातून निर्यात होणार्या अन्य पिकांच्या तुलनेत हापूसचा टक्का कमी आहे. हा टक्का वाढविण्यासाठी कोकणातील उत्पादकांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी निर्यातदारांची संख्या वाढली पाहिजे. हापूसचा दर वाढण्यासाठीही निर्यात अधिक उपयुक्त ठरू शकते.
आंबा लागवड करता आणि केल्यानंतर काळजी कशी घ्यावी यावर डॉ. माळशे यांनी मार्गदर्शन केले. फळाचा दर्जा वाढविण्यासाठी योग्य व्यवस्थापन केले पाहीजे. झाडावरील सुखलेला मोहोर हलवून पाडला तर नर फुल सुरक्षित राहतात. त्यामधून फळधारणा अधिक होते. 225 ते 275 ग्रॅमच्या फळामध्ये साका आढळण्याचे प्रमाण कमी राहते. याची बागायतदारांनी दखल घेतली पाहिजे. कोकण कृषी विद्यापिठाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार झाडाला पाणी दिले पाहिजे, असे डॉ. माळशे यांनी सांगितले.