
दहा वर्षात रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात २० रुग्ण बरे
रत्नागिरी :गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणारे 20 रुग्ण बरे (मानसिक आजार नियंत्रणात आला) झाले आहेत. त्यापैकी 18 रुग्ण शारीरिकदृट्या असक्षम, दुसर्यावर अवलंबून आहेत. 2 पुरुष सक्षम असून, एक बांग्लादेशीय तर दुसरा अलाहाबादचा आहे. शासनाशी पत्रव्यवहार करून त्यांना स्वगृही पाठवले जाणार आहे. एका वर्षांमध्ये महिला, पुरुष मिळून 51 रुग्णांचे कर्जत पुनर्वसन केंद्रात तर 19 महिलांचे बॅनियन केंद्रात पुनर्वसन केले आहे.
राज्यातील चार शासकीय मनोरुग्णालयांमध्ये बरे होऊनही 10 वर्षांहून अधिक काळ खितपत पडलेल्या रुग्णांचे तातडीने योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करा. संबंधित रुग्णांची प्राधान्यक्रम यादी बनवा आणि त्यातील 94 दिव्यांग मनोरुग्णांबाबत विशेष कृती आराखडा सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाला दिले आहेत.
राज्यातील ठाणे, नागपूर, पुणे व रत्नागिरी येथील सरकारी मनोरुग्णालयांत दहा वर्षांहून अधिक काळ उपचार घेत असलेल्या 475 रुग्णांपैकी 263 रुग्ण डिस्चार्जसाठी योग्य असल्याचे रिह्यू बोर्डाला आढळले. 24 जणांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले, अशी माहिती मानसिक आरोग्य प्राधिकरणातर्फे यांनी
दिली.
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाने रुग्णांच्या पुनर्वसनाला अधिक प्राधान्य दिले. गेल्या 10 वर्षांमध्ये मनोरुग्णालयात 20 रुग्ण दाखल झाले. त्यामध्ये 11 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. काही अनोळखी रुग्णदेखील दाखल झाले होते. तेही बरे झाले असून, पत्ता मिळाल्यानंतर त्यांना नेपाळला पाठवले.
वर्षभरात रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात शारीरिकदृष्ट्या असक्षम रुग्ण आहेत; परंतु रुग्ण खितपत पडल्याची परिस्थिती रुग्णालयात नाही.
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात बरे झालेले; परंतु ते शारीरिकदृष्ट्या दुसर्यावर अवलंबून असलेले रुग्ण आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकत नाही, असे 18 रुग्ण आहेत. यामध्ये काही कर्णबधीर, मूकबधिर, अंथरुणाला खिळलेल्यांचा समावेश आहे. या बाबतीत दिव्यांग आयुक्तालयाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.