
फळपिक विमा योजनेमध्ये काजू व आंबा पिकांकरिता सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर
रत्नागिरी, : आपल्या फळपिकाचे प्रतिकूल हवामान परिस्थितीपासून संरक्षण करण्यासाठी हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये काजू व आंबा पिकांकरिता सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे आठ दिवस बाकी आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनःरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. येत्या आंबिया बहारासाठी योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले आहे. अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधित सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती कुऱ्हाडे यांनी केले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. (आंबा, काजू फळपीक वय ५ वर्ष ) कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॕगिंग असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता-
आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये व विमा हप्ता 13 हजार 300 रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपये, विमा हप्ता 5 हजार रुपये असा असणार आहे.
जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत 9 हजार 19 शेतक-यांनी 5280.8 हे. क्षेत्रासाठी सहभाग नोंदवला असून आपण सुद्धा योजनेत सहभागी होऊन आपल्या फळपिकांचे प्रतिकूल हवामान परिस्थितीपासून संरक्षण करावे. योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत काजू व आंबा पिकांकरिता दि. ३० नोव्हेंबर २०२३ अंतिम मुदत आहे.
योजनेचा ‘हप्ता कोठे भरावा
या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बँक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळा वर ऑनलाईन पद्धतीने भरावा तसेच अधिकच्या माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा तसेच पीक विम्यासाठी फळपिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर बंधनकारक असल्याने ई पीक पाहणी अॕपद्वारे फळपिकांच्या नोंदी करून घेण्याचे आवाहनही केले आहे.