
संविधान बचाव रॅली २९ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार
प्रमुख मार्गदर्शक म्हणून आनंदराज आंबेडकर राहणार उपस्थित
रत्नागिरी :रिपब्लिकन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर समाजभूषण पुरस्काराचे म. प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 24 ऑक्टोबर ते ०६ डिसेंबर २०२३ दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी दादर-मुंबई या मार्गाने ‘संविधान बचाव’ यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या संविधान रॅलीचे बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आगमन होणार आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सुमारे ६० राज्यघटनांचा सखोल अभ्यास, चिंतन, मनन करून या देशाला संविधान अर्पित केले आहे. भारतीय संविधान हे केवळ लोकशाही अधिकार कर्तव्य अंतर्भूत असलेले पुस्तक नसून तात्विक दृष्ट्या इथल्या शेवटच्या घटकाची सर्वांगीण काळजी वाहणारा तो एक मूलगामी तत्त्वग्रंथ आहे! परंतु ज्या संविधानाने या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या विचार सूत्रात गुंफून देशाला समृद्धीच्या उंच शिखरावर नेले तेच संविधान बदलण्याची भाषा मनुवादी विचाराचे लोक करीत आहेत. हा धोका ओळखून सर्व समाजातील, जाती-धर्मातील नागरिकांनी, संविधानवादी विचारसरणीच्या सर्व माता भगिनींनी एकत्र येऊन संविधान संवर्धनासाठी भारतीय संविधानाचा बचाव करण्यासाठी आणि संविधानिक समतामुलक समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी जागरूकतेने एकसंघ येऊन लढा उभारणे गरजेचे आहे. समाजामध्ये प्रत्येक नागरिकात संविधान साक्षरता आणि संविधानिक जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने या संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २४ ऑक्टोबर पासून नागपूर दीक्षाभूमी येथून संविधान बचाव यात्रा सुरू झाली असून ही संविधान बचाव रॅली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाणार असून कोकण रत्नागिरी मार्गे दि. ०६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर मुंबई येथे या संविधान बचाव यात्रेचा समारोप होणार आहे. ही संविधान बचाव रॅली दि. २९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणार असून राजापूर, लांजा, पाली येथे संविधान रॅलीचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे तसेच रत्नागिरी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेज समोर सायं. ५.३० वा. मा. आनंदराज आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ३० रोजी संगमेश्वर, तुरळ, आरवली, सावर्डे, चिपळूण- आंबेडकर चौक -बहादूर शेख नाका येथे सायं. ५.३० वा. जाहीर सभा होणार आहे.
या देशातील वंचित, उपेक्षित, बहुजनांच्या अस्तित्वासाठी, देशाच्या सार्वभौमत्वासाठी भारतीय संविधान जिवंत राहणे गरजेचे आहे म्हणून ‘संविधान वाचवा देश वाचवा!’ ही आर्त हाक ऐकून आपण सर्वांनी या संविधान बचाव रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.