
जिल्ह्यात श्रमदानातून बाराशे बंधाऱ्यांची उभारणी
रत्नागिरी :कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात आगामी काळात पाणीटंचाई भेडसावणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषद स्तरावरून दिवाळीपूर्वीच ‘मिशन बंधारे’ मोहीम ग्रामपातळीवर गतिमान करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 1200 हून अधिक बंधारे त्या त्या ठिकाणच्या नदी, नाल्यांवर उभारून पाणीसाठा करण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद स्तरावरून दरवर्षी दिवाळीनंतर गतिमान केली जाणारी ‘मिशन बंधारे’ मोहीम यावेळेस दसर्यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. या 2023-24 मध्ये जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींना प्रति 10 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्यात 8460 कच्चे, वनराई आणि विजय बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील 2022-23 मध्ये हे उद्दिष्ट फक्त 3033 बंधारे बांधून गाठण्यात आले होते. गतवर्षी झालेले जास्त पर्जन्यमान पाहता ही मोहीम उशिराने सुरू झालेली होती. त्यामुळे टंचाईची भीषणताही कमी राहिली होती.
पण या हंगामात जिल्ह्यामध्ये पर्जन्यमानाने सरासरी देखील गाठलेली नाही. त्यामुळे प्रशासन स्तरावरून आतापासूनच पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन केलेले आहे. यावेळेस दसर्यापूर्वीच या मोहिमेला गती देण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तेथील ग्रामस्थांचा सहभाग घेतला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान 10 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. गेल्या 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्ह्यात या मिशन बंधारे लोकचळवळीतून 249 कच्चे, 68 वनराई तर 194 विजय बंधारे उभारण्यात आले होते. आता ही संख्या त्यापुढे गेली असून सुमारे 1200 हून अधिक बंधार्यांची ग्रामस्तरावर उभारणी झाल्याचे जि. प. चे कृषी अधिकारी अजय शेंड्ये यांनी सांगितले.
या बंधारे उभारणीमुळे गावातील जल स्रोतांजवळ बंधारे बांधल्यास लगतच्या विहिरीची, बोअरवेलची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याचा फायदा शेतकर्यांनाही होणार आहे.