
अखेर ‘त्या’ व्हेल माशाचा मृत्यू
रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू झालाय. गेली दोन दिवसांपासून या माशाचा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळून आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे.
गेल्या 42 तासांपासून ग्रामस्थांसह प्रशासनाकडून या माशाचा जीव वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आलंय. बुधवारी रात्री या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झालाय. सायंकाळी भरतीची वेळ नसल्यानं या माशाला जिवंत ठेवण्यासाठी त्याला पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं असल्यानं एमटीडीसी कर्मचारी तसंच ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांनी समुद्राच्या पाण्याचा मारा करून त्याला जिवंत ठेवलं होतं.
दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ ग्रामस्थांना व्हेल माशाचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत आढळून आलं होतं. या पिल्लाची प्रकृती खालावलेली होती. ग्रामस्थांनी लगेच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. यानंतर वनविभागाकडून या व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी खुप प्रयत्न सुरू होते. कापड्यामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या माशाला जेसीबीच्या सहाय्यानं समुद्रात सोडण्यात आलं होतं.
मात्र, बुधवारी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आलं. 20 फुटांहून अधिक लांब आणि 5 ते 6 टन इतकं या माशाच्या पिल्लाचं वजन होतं. पर्यटक, स्थानिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसंच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झालाय.