
रत्नागिरीत आठ वर्षांनी ७८ बागायतदारांना व्याज परतावा
रत्नागिरी:- फेब्रुवारी-मार्च २०१५ मधील अवेळी पाऊस, गारपिटीमुळे शेती व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. त्या प्रस्तावानुसार एकूण ७८ लाभार्थींना दहा लाख ९२ हजार २४९ इतके अनुदान मंजूर झाले आहे. सन २०१५ मधील पावसाच्या नुकसानीचा दिलासा २०२३ मध्ये मिळाला आहे.
गारपीटग्रस्त आणि अवकाळी पाऊसग्रस्त शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे व्याजमाफीचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले होते. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे व्याजमाफीचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून सहकार आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पावस (रत्नागिरी) येथील ७८ लाभार्थ्यांना व्याज सवलतीची रक्कम नुकतीच मंजूर करण्यात आली. या सर्व प्रक्रियेला विलंब होण्यामागे फेरप्रस्ताव आणि करोना आपत्ती ही कारणे आहेत. आतापर्यंत सर्व ४४२ लाभार्थ्यांना रक्कम मंजूर करण्यात आली. आतापर्यंत एकूण ३८ लाख २२ हजार २४९ इतकी रक्कम लाभार्थ्यांना दिली आहे. त्यातील ७८ लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.