
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती
रत्नागिरी :जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत जाताना आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. विना हेल्मेट वाहन चालकाला हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवानाही रद्द होणार आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याची तत्काळ अंमलबजावणीही सुरू केली असून, येथे दुचाकी घेऊन येणार्या प्रत्येकाकडे हेल्मेट असणे बंधनकारक करण्यात आले असून, नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य कार्यालयांतही याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मोटारवाहन कायदा 1988 च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार, याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कर्मचार्यांना, तसेच कामानिमित्त येणार्या प्रत्येकाला हेल्मेट सक्तीच्या आवाहनवजा सूचना करण्यात आल्या आहेत. सर्वच शासकीय कार्यालयांत हे नियम लागू करण्यात आले
आहेत.