
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून लढण्यास तयार: भास्कर जाधव
रत्नागिरी :चिपळूण मतदार संघामध्ये यापूर्वी आपण आमदार राहिलो आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत आपल्याला प्रेम आहे. या मतदार संघात आपण उभे राहण्यास इच्छूक आहे. परंतु चिपळूणचा मतदार संघ मी मागितला तर पवार साहेबांना आणखी एक मतदार संघ द्यावा लागेल असे आ. भास्कर जाधव यांनी सांगत आपण चिपळुणात लढायला तयार असल्याचा सुतोवाच केला.
रत्नागिरीत एका कार्यक्रमासाठी आलेल्या आ. भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टिका केली. परंतु दिल्लीच्या वेशीवर 13 महिने आंदोलन करणार्या शेतकर्यांपैकी 780 शेतकर्यांचा मृत्यू झाला. शेतकर्यांकडे दुर्लक्ष करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यामुळे शरद पवार यांनी काय केले हे विचारण्याचा अधिकारच नसल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. भारताने शेतीक्षेत्रामध्ये निर्यातदार म्हणून जो आपला दबदबा निर्माण केला आहे, हे पवार साहेबांचे कर्तृत्व असल्याचेही आ. जाधव यांनी सांगितले.
‘कॅग’ ही संस्था 1948 मध्ये स्थापन झाली. परंतु या संस्थेने सरकारचेच घोटाळे बाहेर काढल्याने, ही संस्था बंद करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतल्याची टिकाही आ. जाधव यांनी केली.
शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना छक्केपंजे माहीत नाहीत. ते होते म्हणून कोरोना काळात महाराष्ट्र कठीण परिस्थितीमधून बाहेर आला.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भाषणे खुसखुशीत असतात. आपण ही रंगतदार भाषण चालू करतो आणि मुंबई-चिपळूण मार्गावर प्रवास सुरु करतो. मात्र गडकरी साहेबांचा आपण आदर करतो असा टोलाही आ. भास्कर जाधव यांनी मारला.
शिवसेना आमदार सुनावणीबाबत ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांकडून न्याय मिळेल याची आपल्याला काडी मात्र आशा नसल्याचे त्यांनी स्पष्टच सांगितले.
देवेंद्र फडणवीसांच्या मनात येत नाही तोपयर्र्त मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा घेतल्या तरी मराठा आरक्षण मिळणार नाही अशी टिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी असताना उध्दव ठाकरे यांनी मराठ्यांना टिकाऊ स्वरुपाच आरक्षण दिले होते. मात्र त्यानंतर नव्या सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केल्याची टिका त्यांनी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ठिकाणी आतापर्यंत कधी देवेंद्र फडणवीस गेल्याचे तुम्ही पाहिले आहेत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जोपर्यंत फडणवीस मनावर घेत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा घेतल्या तर मराठा आरक्षण मिळणार नाही अशी आपली धारणा असल्याचेही आ. भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाचा आता संयम सुटत असेल तर तो का सुटतो याचा अभ्यास राज्य सरकारने करावा असा सल्लाही आ. जाधव यांनी दिला.