
पालिका पॅनेलवर वकील नियुक्तीसाठी निकष हवेत
ॲड. अमेय परुळेकर ; कोणतीही अट नसल्याचे पालिकेचे उत्तर
रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या पॅनेलवर घेण्यात येणाऱ्या वकिलांबाबत कोणतेही निकष लावले जात नाहीत. मी मागवलेल्या माहितीमध्ये कोणतीही किमान अट नाही, असे उत्तर पालिकेने दिले आहे. दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाच्या केसेसमध्ये यामुळे पालिकेचे नुकसान होत आहे. पालिकेची बाजू न्यायालयात भक्कम मांडण्यासाठी पालिकेने निकष तयार करून पॅनेलवरील वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अमेय परूळेकर यांनी केली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, माझा कोणत्याही वकिलावर आक्षेप नाही; परंतु मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा याबाबत कोणतेही निकष नाहीत. कायदेशीर नियमावली नाही. अनेक असे वकील आहेत की, त्यांनी पॅनेलवर घेण्यासाठी विनंती अर्ज केला. त्यांनी २०२० मध्ये मुंबई विद्यापिठामधून बीएलएस आणि एलएलबीचा अभ्यास पूर्ण केला. जानेवारी २०२१ ला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवातर्फे वकिली सनद प्राप्त केली. त्यांनी पालिकेच्या पॅनेलवर घेण्यासाठी अर्ज केला आणि त्यांना लगेच घेण्यात आले. पालिकेच्या ठरावासह माझ्याकडे याची माहिती आहे. याबाबत माझा कोणत्या वकिलावर आक्षेप नसला तरी दिवाणी, फौजदारी प्रकरणामध्ये जे वकील पारंगत आहेत त्यांना अनुभव आहे. अनेक केसेस त्यांच्या बाजूने लागल्या आहेत, अशा अनुभवी वकिलांची नियुक्ती व्हावी यासाठी पालिकेने निकष तयार करण्याची गरज आहे.
पालिकेच्या पॅनेलवर एकूण १७ वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये १५ पुरुष आणि २ महिला आहेत. यामध्येही ५० टक्के महिलाना संधी देण्याचा निकष धाब्यावर ठेवला आहे. विविध केसेसमध्ये पालिकेची बाजू न्यायालयात भक्कम मांडता यावी हा यामागील उद्देश आहे.