
उद्धव ठाकरेंनीच हिंदुत्वाची वाट लावली – बावनकुळे
रत्नागिरी :इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर सनातन हिंदू धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्या उदयननिधींच्या आघाडीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी आहेत. उद्धव ठाकरे यांनीच हिंदुत्वाची वाट लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला विरोध करून श्री.ठाकरे यांनी पाप केले आहे. त्यांना शरद पवारांनी साथ दिली. परंतु येथील पाप येथेच फेडावे लागते. त्यामुळे हिंदुत्वाच्या विरोधातील सत्तेला लाभ मारून एकनाथ शिंदेंनी विकासाला साथ दिली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विक्रमी खासदार लोकसभेत निवडून जातील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
संपर्क से समर्थन ही भव्य रॅली शहरातून काढण्यात आली. स्वातंत्र्य लक्ष्मीचौक येथे रॅलीची सांगता झाली. येथे आयोजित कॉर्नर सभेला मार्गदर्शन करताना आ.बावनकुळे बोलत होते. यावेळी यात्रेचे प्रमुख विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री.बाळ माने, लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रमोद जठार, अतुल काळसेकर, सौ.उल्का विश्वासराव, महिला जिल्हाध्यक्षा सौ.सुजाता साळवी, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, शैलेंद्र दळवी यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप शिवसेनेला जनतेने कौल दिल्यानंतर सर्वाधिक आमदार असलेल्या भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते. परंतु उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना विरोध होता. शरद पवार यांना हाताशी धरून ते स्वतः मुख्यमंत्री झाले. असे असुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढा घेऊन जा असे उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. परंतु ते एकदाही दिल्लीत गेले नाहीत. परंतु आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बहुसंख्य खासदार विजयी होतील असा दावा आ.बावनकुळे यांनी केला.
आज देशात मोदींची लाट कायम आहे. केळी विकणारा, भाजी विकणारा, मच्छीमार, आदिवासी सर्वचजण मोदींचे नाव घेत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही भाजप महायुतीचा खासदार विजयी होईल असेही त्यांनी सांगितले. परंतु आता तुमची जबाबदारी वाढलेय. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे हे कार्यकर्त्याचे काम आहे असे आ.बावनकुळे यांनी सांगितले. काँग्रेसने केवळे आश्वासने दिली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराची उभारणी सुरू केली राममंदिराच्या उद्घाटनाला रत्नागिरीतून 15 हजार कार्यकर्त्यांना वातानुकुलित रेल्वेतून अयोध्येत घेऊन जाणार असल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यावर जबाबदारी सोपवत असल्याचे आ.बावनकुळे यांनी जाहीर केले.