
विविध लघुपाटबंधारे योजना
भूसंपादनाबाबत 15 दिवसांत मुल्यांकन करावे : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी,: जिल्हयातील विविध लघुपाटबंधारे योजनांबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, मोबदला देण्यासाठी भूसंपादनबाबत भूमिअभिलेख, वन, कृषी व प्रांतांनी प्राधान्यांने 15 दिवसांत सर्व्हेक्षण करुन, त्या बाबत मुल्यांकन करावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील विविध लघुपाटबंधारे योजना संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे, विशेष भू संपादन अधिकारी निशाताई कांबळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, वैशाली माने, विजय सूर्यवंशी, पाटंबंधारे विभागाचे सुहास गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री सामंत म्हणाले, जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी दर 15 दिवसांला भूसंपादनाबाबतचा आढावा घ्यावा. प्रांतांनीही त्यांच्या स्तरावर याबाबत बैठक घ्यावी. कार्यतपरतेने शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्याबाबत काम करावे.
ज्या योजना संदर्भात शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, त्या जमिनीत असणारी फळझाडे, जमिनी या बाबतचे सर्व्हेक्षण करुन मुल्यांकन करावे. भूसंपादनाचा विषय मार्गी लावूनच योजनांची कामे करावीत, असेही म्हणाले.
लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन दरडप्रवण गावांचे सर्व्हेक्षण करा
दरडप्रवण असणारी गावे त्याच बरोबर संभाव्य दरडप्रवण गावांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी प्रांतांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन गावांचे सर्व्हेक्षण करावे. अशा गावांच्या पुनर्वसनासाठी शासकीय जमिनीही शोधून ठेवा. सिडकोच्या माध्यमातून घरे बांधून त्यांचे कायमस्वरुपी पुनवर्सन करण्याबाबत प्राध्यान्याने हे काम करावे, अशी सूचनाही पालकमंत्री श्री. सामत यांनी यावेळी दिली.