
शिंदे गटातील अनेक जण परतीच्या मार्गावर: खा. राऊत
रत्नागिरी :आम्ही चुकलोय, आम्हाला पश्चाताप होतोय, त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवर येऊन उद्धव साहेबांची माफी मागायची आहे, अशा पद्धतीचे निरोप शिंदे गटातील अनेकांचे आहेत असा गौप्यस्फोट करत, लोकसभा निवडणुकीच्या आधी शिंदे गटात मोठा भूकंप होईल असं भाकीत खासदार विनायक राऊत यांनी वर्तवलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, ज्या 13 खासदारांनी बेईमानी केली, गद्दारी केलेली आहे, त्यांच्यापैकी जास्तीत जास्त 3 जणांना पुन्हा एकदा निवडणूक लढवायला संधी मिळेल, अशी आमची माहिती आहे. बाकीच्या 10 जणांचं विसर्जन 100 टक्के होणार आहे. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचे निरोप प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष येत आहेत, पण ते कोणाकोणाचे आहेत ते मी आता सांगणार नाही, परंतू मींधे गटामध्ये जबरदस्त भूकंप होणार आहे, असं खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुका एप्रिलमध्ये आहेत, साधारणतः फेब्रुवारीला आचारसंहिता जाहीर होईल, त्याच्या अगोदरच हा भूकंप होईल, असं भाकीत खासदार विनायक राऊत यांनी यावेळी वर्तवलं आहे.
आम्ही चुकलोय, आम्हाला पश्चाताप होतोय, त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवर येऊन साहेबांची, उद्धव साहेबांची माफी मागायची आहे, अशा पद्धतीचे निरोप बरेच आहेत, असा गौफ्यस्फोट यावेळी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केला.
इंडिया आघाडीसमोर सर्वांचा सुफडा साफ होईल – खा. राऊत
गद्दारांनी उद्धव ठाकरेंना शहाणपण शिकवू नये, 2024 ला इंडिया आघाडीलाच महाराष्ट्रासह देशात यश मिळेल. मराठा आणि ओबीसी यांच्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहेत, त्यांना दोन्ही समाज धडा शिकवेल. आणि इंडिया आघाडीसमोर सर्वांचा सुफडा साफ होईल, असंही खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.