
वानर-माकडांच्या बंदोबस्तासाठी अविनाश काळे यांचे आमरण उपोषण सुरु
रत्नागिरी :वानर व माकडांना मारण्यास बंदी असल्यामुळे शेतकर्यांची हातची पिके जात असून, शेतकरी उध्वस्त होत आहेत. शेतकर्यांना राहणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे वानर-माकडांच्या संख्येला आळा घालणे महत्वाचे आहे. या त्रासामुळे भविष्यात शेतकर्यांना शेती बागायती सोडावी लागेल व कोकण भकास होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे वानर व माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आमरण उपोषण करणारे शेतकरी अविनाश काळे यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर वानर व माकडांच्या बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी अविनाश काळे यांनी गुरुवारपासून उपोषण सुरु केले असून, शेतकरी बांधवांचा मोठ्याप्रमाणात पाठिंबा त्यांना मिळत आहे. शेकडो शेतकर्यांनी उपोषण स्थळी उपस्थिती लावून अविनाश काळे यांच्या सोबत असल्याचा इशाराचा प्रशासनाला यावेळी दिले. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वीही अविनाश काळे यांनी या मागणीसाठी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण केले होते. त्या वेळी शेतकर्यांचा चांगला पाठिंबा मिळाला होता. कोकणातून सर्व जिल्ह्यांतून शेतकर्यांनी पाठबळ दिले होते. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्यांची एक महत्वाची सभा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात घेण्यात आली होती. त्यालाही शेतकर्यांची चांगली उपस्थिती होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन, वनविभाग यांना प्रत्येक शेतकर्याने निवेदन दिले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, परिक्षेत्र वनाधिकारी या सर्वांना वानरांच्या बंदोबस्तासंदर्भात निवेदन पाठवण्यात आली होती. मात्र प्रशासन व सत्ताधार्यांकडून पुढे काहीच हालचाली न झाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
कृषी विभागाच्या योजना राबवायच्या कोणासाठी? वानर, माकडांसाठी का? असा प्रश्न अविनाश काळे यांनी उपस्थित केला आहे. वानरांचा कायमचा बंदोबस्त व्हावा. तात्पुरता उपाय म्हणून त्यांना पकडून अभयारण्यात सोडावे. आम्हाला आमची शेती बागायती भयमुक्त करू दे अशी मागणी त्यांनी केली आहे. वानर व माकडांमुळे शेतीला कंटाळून कोकणी माणसें नोकरीसाठी बाहेर पडत आहेत. कोकणातील गावेच्या गावे ओस पडली तर पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाहीत, असा इशारा काळे यांनी दिला आहे.