
वानर, माकडांच्या त्रासाविरोधात गुरुवारपासून अविनाश काळे यांचे बेमुदत उपोषण
रत्नागिरी : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. वानरांचा बंदोबस्त व्हावा व भयमुक्त शेती करता यावी या मागणीकरिता गुरूवारपासून (ता. ५) अविनाश काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसण्याचे ठरवले आहे. सरकारने वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा, ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
यापूर्वी काळे यांनी या मागणीसाठी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण केले होते. त्या वेळी शेतकऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळाला होता. कोकणातून सर्व जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी पाठबळ दिले होते. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक महत्वाची सभा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात घेण्यात आली होती. त्यालाही शेतकऱ्यांची चांगली उपस्थिती होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन, वनविभाग यांना प्रत्येक शेतकऱ्याने निवेदन दिले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, परिक्षेत्र वनाधिकारी या सर्वांना वानरांच्या बंदोबस्तासंदर्भात निवेदन पाठवण्यात आली आहेत; मात्र अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काळे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
कृषी विभागाच्या योजना राबवायच्या कोणासाठी? वानर, माकडांसाठी का? असा सवाल अविनाश काळे यांनी केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काळे यांनी कोकणचे दुःख कोणी दूर करेल का? या प्रश्नाबाबत फेसबुकवर लेख लिहिला होता. त्यानंतर पुढील आठ दिवस अखंडितपणे आणि त्यानंतरही जवळपास ७००च्या आसपास फोन आले. प्रत्येक शेतकरी माकडांच्या त्रासामुळे हैराण झाला आहे.
वनखात्याची १९२६ ही हेल्पलाइन आहे. त्यावरही शेकडो फोन करूनही प्राणी न्यायला माणसे आलेली नाहीत. वानरांचा कायमचा बंदोबस्त व्हावा. तात्पुरता उपाय म्हणून त्यांना पकडून अभयारण्यात सोडावे. आम्हाला आमची शेती बागायती भयमुक्त करू दे. आमचा तो हक्क आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. कोकणातील गावेच्या गावे ओस पडली तर पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाहीत, असा इशारा काळे यांनी दिला आहे.
वानर करतात नासधूस
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानर, माकडांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेतकरी, बागायतदार आणि नागरिक मेटाकुटीला आले आहेत. कोकणातील माणूस अजूनपर्यंत आत्महत्या करत नव्हता; पण आता वानरांमुळे शेतकऱ्यांवर ती वेळ येऊ शकते. वानर, माकडे घरावरील नळे, पत्रे फोडतात, पाईप तोडतात, घरात शिरून नासधूस करतात. माणसांच्या अंगावरही धावून येतात. हे प्रकार वाढले आहेत. गेल्या साधारणपणे ३५ वर्षात वानर, माकडे मारणे बंद झाले त्यामुळे त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आज ही जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे.