
मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यास प्रशासनाचा विलंब
मिठगवाणेच्या सरपंच साक्षी जैतापकर यांचे उपोषण
रत्नागिरी:साने गुरुजी विद्यामंदिर जानशी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी या शाळेच्या प्र. मुख्याध्यापकांवर कारवाईस विलंब होत असल्याने त्यांचे आर्थिक गैरव्यवहार चालूच असल्याच्या पार्श्वभूमीवर मीठगवाणे च्या सरपंच साक्षी जैतापकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण अवलंबले आहे.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात साक्षी जैतपकर यांनी म्हटले आहे, की संदर्भिय शाळेच्या प्र. मुख्याध्यापकांवर शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. रत्नागिरी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आपल्या कार्यालयासमोर यापूर्वी उपोषणास बसले होते. परंतु आपण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. रत्नागिरी यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून संबंधीतांची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले म्हणून मी त्यावेळी उपोषण मागे घेतले.
त्या प्रमाणे नेमलेल्या चौकशी समितीने शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन प्र. मुख्याध्यापक बलवंत गणपत सुतार यांची माझ्या समक्ष चौकशी केली. त्या चौकशी समितीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. रत्नागिरी यांचेकडे अहवाल सादर केल्याचे समजले.या चौकशी समितीच्या सदस्यांनी पालक शिक्षक रत्नागिरी – सघाच्या माध्यमातून जमा केलेली सुमारे २,७५,०००/- इतकी रक्कम सर्वांना परत करून त्याच्या पोच पावत्या समितीकडे ८ दिवसात देण्यास सांगीतले होते. परंतु मुख्याध्यापकानी मुद्दाम उशीर केला. तसेच सर्व पालकांच्या सह्या घेऊन काहि पालकांचेच पैसे परत केले. काही पालकांचे पैसे हाती
परत घेतले.
साने गुरुजी विद्यामंदिर जानशी ही शाळा साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमार्फत (खाजगी) चालवली जाते. या संस्थेची कार्यकारणी न्याय प्रविष्ठ आहे. याचा गैरफायदा घेऊन बलवंत सुतार प्र.मुख्या. यांना देणगी जमा करण्याचे किंवा शाळेची दुरुस्ती करण्याचे कोणतेच अधिकार नसताना अशा प्रकारे देणगी जमा केली होती. चौकशी झाल्यावर सुद्धा त्यांचे हे आर्थिक गैरव्यवहार थांबलेले नाहीत. त्यांनी माजी विद्यार्थ्यांना वॉट्स अँप मेसेज करून रक्कम दुकानदार व कारागीर यांना परस्पर देण्यास सांगीतले आहे. तसेच वॉट्स अॅप मेसेज द्वारे मला धमकवण्याचे प्रकार चालू असल्याचेही साक्षी जैतापकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
गेली दोन अडीच वर्षे प्रशासनावर विश्वास ठेवून मी माझा लढा सनदशीर मार्गाने चालू ठेवला आहे जेणे करून माझ्या परीसरातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. तरी संबंधीतीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी साक्षी जैतापकर यांनी केली आहे.
ज्यावेळी तक्रार दाखल झाली त्यानंतर गटविकास अधिकार्यांनी मुख्याध्यापकांचा जबाब नोंदवला होता .तसेच प्रत्यक्ष तपासणी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकार्यांना पाठविला होता. या अहवालात मुख्याध्यापक दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
मुख्याध्यापक दोषी असल्याचा अहवाल आला असताना या मुख्याध्यापकांवर कोणतीच कारवाई न करता वारंवार त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहे. शिक्षण विभागातील काही कर्मचार्यांचे मुख्याध्यापकांशी लागेबांधे असल्याचा आरोप सरपंच जैतापकर यांनी यावेळी केला आहे.