
रत्नागिरी किल्ला येथील महिलांचा नगरपरिषदेवर हंडामोर्चा
रत्नागिरी: रत्नागिरीकरांचे पाणी संकट गंभीर होत असतानाच किल्ला परिसरातील अनेक नागरिक हंडा मोर्चा घेऊन पालिकेवर धडकले. पाणी द्या, पाणी द्या ,मुख्याधिकारी हाय हाय, अशा घोषणांनी पालिकेचा परिसर दणाणून गेला. पालिकेच्या गणपतीचे विसर्जन होणार होते. त्यापूर्वीच नागरिकाने गणरायाला पाण्यासाठी साकडे घातले. माजी पाणी सभापती निमेश नायर यांनी किल्ले कर मंडळींची भेट घेऊन एमआयडीसी कडून पाणी देण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे सांगून लवकरच मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ या, असे सांगितल्यानंतर घरी रवाना झाले.

शीळ येथील जॅकवेल कोसळल्यानंतर अजूनही रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. तरीही पाणी वितरणाचे वेळापत्रक स्थिर होण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागणार आहेत. सलग पाच दिवस पाणी न आल्यामुळे किल्ला येथील नागरिक बाबू तळेकर यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिला पुरुष हंडामोर्चा घेऊन पालिकेवर धडकले. तेथे घोषणाबाजी केल्यानंतर सर्वांनी पालिकेच्या गणरायाचे दर्शन घेऊन तेथेच ठिय्या दिला. गणरायाकडे पाणीटंचाईचे संकट दूर कर असे साकडेही घातले. यादरम्यान किल्ल्याभागात पाणीपुरवठा सुरू केल्याची बातमी आली. किल्ल्यातील लोक मोर्चा घेऊन गेल्यानंतर लगेच पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. किल्लेदार मंडळींशी चर्चा करण्याकरिता माजी पाणी सभापती नायर यांनी नगरपालिका गाठली. तेथे त्यांनी प्रमुख किल्ले कर मंडळींशी चर्चा केली. टाक्या भरत नसल्यामुळे पाणी दाबाने वर चढू शकत नाही पाणीपुरवठा सोडलीत होण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. उद्या पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करूया असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्व किल्लेकर घरी परतले.
