
ढोल-ताशांच्या गजरात भाजपा जिल्हाध्यक्षानी दिली मजिप्रा कार्यालयास भेट.
रत्नागिरी :रत्नागिरीतील नागरिकांच्या प्रश्नांबाबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले गेल्या काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नेतृत्वाची कमान खांद्यावर घेतल्यानंतर विविध सामाजिक समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी न.पा. कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या नळपाणी योजनेच्या निकृष्ट कामाच्या तक्रारी नागरिकांच्या माध्यमातून समजल्यानंतर भाजपा रत्नागिरीच्या कार्यकर्त्यांनी श्री. राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशांच्या गजरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, साळवी स्टॉप येथे जाऊन अधिकार्यांना धारेवर धरले.
जवळपास १ तासाहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले. तब्बल ५४ कोटी रुपये निधी सुरुवातीच्या काळात उपलब्ध झाला. मात्र वाढीव निधी आणि वाढीव वेळ प्राप्त झाल्यानंतरदेखील काम पूर्णत्वास गेल्याचे पहायला मिळत नाही. यास अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता जबाबदार आहे की उदासिनता जबाबदार आहे, असा खडा सवाल विचारण्यात आला. शासनाच्या माध्यमातून आत्तापर्यंत या योजनेसाठी ९० कोटी रुपये खर्च झाले असून ही रक्कम थोडीथोडकी नव्हे, असे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी कार्यकारी अभियंत्यांना सुनावले.

योजनेला तांत्रिक मंजूरी देण्याचे अधिकार असलेले हे कार्यालय जर अशा तर्हेने हात वर करून शासनाच्या निधीचा व्यय होताना पहात असेल तर ते खपवून घेणार नाही. भारतीय जनता पार्टी जनतेला केंद्रस्थानी मानून काम करणारी पार्टी आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असूनदेखील भाजपा कार्यकर्त्यांनी आजवर वैधानिक मार्गाने जनतेच्या हितासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज भाजपाने दिलेल्या पत्रावर संबंधित विभागाने गांभीर्याने उचित कार्यवाही करावी हीच आम्हा कार्यकर्त्यांची मागणी असे जिल्हाध्यक्षांनी नमूद केले.
तसेच मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत सदर योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र असे न झाल्यास भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन छेडणार आणि त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निक्षून सांगण्यात आले.