
रत्नागिरी जिल्हयामध्ये लोकअदालतीमध्ये १२१४ प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे निकाली
रत्नागिरी :रत्नागिरी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी मा. अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री. व्ही आर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लाेकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे वाद प्रलंबित राहिल्यामुळे त्याचा परिणाम काैटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यावर पडताना दिसून येताे. काही वेळा न्यायालयीन प्रक्रियेचा वापर विरुध्द पक्षकाराला त्रास देण्यासाठीसुध्दा केला जातो. वादावर तोडगा निघत नसल्यामुळे वाद प्रलंबित राहून विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो. जास्त संख्येने प्रलंबित असलेले वाद यामुळे न्याययंत्रणेवरसुध्दा ताण येतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होतो. प्रलंबित असलेला वाद हा दोन्ही पक्षकारांच्या हिताचा नसताे. केवळ आर्थिक किंवा वेळेचा अपव्यय तेवढयापुरताच हा प्रश्न मर्यादित राहिला नसून मानसिक ताण-तणाव यामुळे होणारी हानी ही पैशाच्या स्वरुपातसुध्दा भरुन काढता येणारी नसते. त्याच पाश्र्वभूमीवर लोकन्यायालय म्हणजेच लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून वाद निवारण हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्याचा फायदा दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये हजारो पक्षकारांनी घेतला. लोकअदालतचे उद्घाटन मा. अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री. व्ही आर जोशी यांच्या हस्ते तसेच उपस्थित जेष्ठ पक्षकार यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले. लोकअदालतचे उद्घाटनवेळी मा. जिल्हा न्यायाधीश - १ श्री. ए. एम. अंबालकर, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. आर. एम. चौत्रे, दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. एम. सातव, सह दिवाणी न्यायाधीश श्री. एन. एन. पाटील, २ रे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती. एस. एस. वणकोरे, वकील संघाचे अध्यक्ष श्री. धारिया, सरकारी वकील श्री. फणसेकर, जिल्हा न्यायालय रत्नागिरी चे प्रबंधक श्री. खानोलकर, लॉ कॉलेज चे प्रभारी प्राचार्य श्री. बर्वे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी चे सचिव श्री. एन. जी. गोसावी व इतर मान्यवर न्यायिक अधिकारी आणि विधीज्ञ उपस्थित होते. लोकअदालतमध्ये जिल्हयाभरातून ३७८० न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि १३८५७ वादपूर्व प्रकरणे दाखल करण्यात आली हाेती. सचिव श्री निखिल गोसावी यांनी प्रास्ताविक सादर करताना राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्या मागचा हेतू व उद्देश उपस्थित पक्षकार व विधीज्ञ यांना समजावून सांगितला. जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. आर. जोशी यांनी यावेळी उपस्थित पक्षकार व विधीज्ञ यांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडी ने मिटविन्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमावेळी नाईक आईस अँड कॉल्ड स्टोरेज रत्नागिरी या कंपनीची ७२ प्रकरणे तडजोडी ने मिटविण्यात आली. यासाठी कंपनीचे सर्व भागीदार तसेच कंपनी तर्फे वकील श्री. मकरंद कदम यांनी मोलाचे सहकार्य केले. कंपनी तर्फे ७२ प्रकरणांमध्ये वरील मान्यवर यांच्या उपस्थीतीमद्ये धनादेशाचे वाटप करण्यात आले. सदर लोकअदालमध्ये १२१४ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आले. एकूण ११, १७, ५९, ९३५ (रक्कम रुपये अकरा कोटी सतरा लाख एकोणसाठ हजार नऊशे पस्तीस मात्र) एवढया रकमेची वसुली आणि वाद सांमजस्याने निर्णीत झाले. त्यामध्ये वकीलवर्ग व पक्षकार यांचा सहभाग होता. त्यामुळे लोकांमधील वैरभाव मिटून भाईचारा वाढण्यास नक्कीच मदत झाली. सदर लोक अदालत मद्ये प्रशिक्षण दिलेले एस.बी.कीर विधी महाविदयालयाचे विदयार्थी यांनी वकील क्षेत्रात पाय ठेवण्या अगोदर लोकांचे वाद समजून घेउन समुपदेशन उपक्रमात आणि लोकन्यायालयाच्या दिवशी लोकांना सहकार्य करण्यास मोलाचा सहभाग दिला. त्यामुळे सामंजस्याने वाद निवारण माेठया संख्येने करणे शक्य झाले. लोक न्यायालयामध्ये अशा प्रकारचे निर्णय करताना पक्षकारांना न्यायप्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होता येते. कोणतेही न्यायालयीन शुल्क दयावे लागत नाही. वकिल फी, न्यायालयात येण्या-जाण्याचा खर्च, अन्य खर्च आणि वेळेची बचत झाल्याचा आनंद पक्षकारांना चेह-यावर दिसत हाेता. विशेष म्हणजे जिंकलो किंवा हरलो हा भाव पक्षकारांमध्ये राहिला नाही. आपल्यावर निर्णय लादला गेला ही भावनासुध्दा त्यांच्यामध्ये नव्हती. लोकअदालत ही लवचिक प्रक्रिया असून त्यावर पक्षकारांचे नियंत्रण असते. परिस्थितीला अनुसरुन त्यामध्ये निवाडा घेता येतो. अनेक पक्षकारांमधील दुरावा, नातेसंबंध स्नेहात बांधले गेले. वादाचा निर्णय जलद आणि मैत्रीपूर्ण वातावरणात झाला. त्यामुळे पक्षकारांची आर्थिक हानी झाली तर नाहीच त्याचबरोबर त्यांना मानसिक आणि आत्मीक समाधान प्राप्त झाले. लोकन्यायालयात जे निर्णय झाले त्याच्यावर अपील, रिव्हीजन यामधील श्रम खर्च टाळला गेला. न्यायालयाची पायरी न चढताच मैत्रीपूर्ण वातावरणात झालेल्या निर्णयामुळे विधी सेवा प्राधिकरणातर्फे राबविण्यात आलेला उपक्रम म्हणजे वाद थेट लोकन्यायालयात याला यशस्वी प्रतिसाद मिळत आहे. त्याच्यामधून भारतीय राज्यघटनेला अपेक्षित सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सहज साधता येणे शक्य आहे.
