
सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे आज रत्नागिरीत ठिय्या आंदोलन
रत्नागिरी :मराठा समाज बांधवांवर जालना येथे झालेल्या लाठिमाराच्या निषेधार्थ रत्नागिरीतील सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
जालना येथे मराठा आरक्षणासाठी शांतपणे उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर विनाकारण लाठीहल्ला करण्यात ‘आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी या लाठीमाराच्या निषेधार्थ निदर्शने, मोर्चे, रास्तारोको, बंद पुकारण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर रविवारी मराठा मंडळ, रत्नागिरी, क्षत्रिय मराठा मंडळ आणि अन्य मराठा संघटनांची एक सभा बोलावण्यात आली होती. या सभेमध्ये लाठीमाराच्या निषेधार्थ मंगळवारी ५ सप्टेंबरला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठा समाज बंधू, भगिनींनी या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळ, मराठा मंडळ, रत्नागिरी यांच्यावतीने करण्यात आले आहे. ठिय्या आंदोलनात रत्नागिरी, पाली, लांजा, देवरुख आणि तालुक्यातील सर्व मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि बांधवांनी उपस्थित रहावे असेदेखील आवाहन करण्यात आले आहे.