
‘लेटस चेंज’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 65 हजार विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर
रत्नागिरी: शालेय शिक्षण विभागामार्फत ‘लेटस चेंज’ उपक्रमांतर्गत जवळपास ३८ लाख विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर म्हणून काम करणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील २ हजार १३० शाळेमधील ६४ हजार ९६७ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
शालेय शिक्षण विभागामार्फत ‘लेटस चेंज’ या उपक्रमातंर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनविण्यात येत आहे. याचा शुभारंभ मुंबई येथे सहयाद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव इम्तियाझ काझी, प्रकल्प संचालक रोहित आर्या यांच्यासह शाळांचे स्वच्छता मॉनिटर प्रतिनिधी उपस्थित होते.
निश्चय केला की बदल घडतोच, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लेटस चेंज’ या उपक्रमात राज्यातील ३८ लाख विद्यार्थी अमुलाग्र बदल घडवतील, असा विश्वास व्यक्त केला. मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मॉनिटरनी कचऱ्याबाबत बेफिकिरी थांबविल्यास महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर व्हायला वेळ लागणार नाही असेही त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वच्छतेसाठी नियोजन केलेल्या या अभियानाचे स्वरुप आतापर्यंत होत असलेल्या स्वच्छता अभियानापेक्षा वेगळे आहे. अनेक ठिकाणी याबाबत कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याचे असे त्यांनी सांगितले.
या अभियानात विद्यार्थी स्वच्छता दूत नसून मॉनिटर आहेत, अशी माहिती प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी दिली. तसेच स्वच्छता मॉनिटर कुठेही येता-जाताना कोणी बेफिकीरपणे थुंकताना किंवा कचरा टाकताना दिसल्यास त्याच जागी त्या व्यक्तीला थांबवून झालेली चूक दर्शवून देत सुधारण्याचे आवाहन करणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाने शिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांनी हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील शाळांसोबत समन्वय साधण्याची जबाबदारी सहायक कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा समन्वयक पीएलसी शिक्षण विस्तार अधिकारी मंजुषा पाध्ये यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उपक्रमांत पालकांना सहभागी करुन रत्नागिरी जिल्हा कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याचा संकल्प शालेय शिक्षण विभागाने केला आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी कळविले आहे