
विक्रम ठेव योजनेत विक्रमी ठेवी ; ६ कोटी ९० लाखांचे ठेव संकलन – ॲड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी :स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने चांद्रयान – 3 च्या यशस्वी उपक्रमाचे औचित्य साधत विक्रम ठेव योजना केवळ ६ दिवसासाठी राबवली. चांद्रयानाच यश द्विगुणीत व्हावं म्हणून ९ % हा अधिकचा व्याजदर दिला. गुंतवणूक करणाऱ्या ३६५ ठेव खात्यांचे माध्यमातून ६ कोटी ९० लाखांच्या नव्या ठेवी स्वरूपानंद पतसंस्थेत जमा झाल्या. आज अखेरच्या दिवशी दुपारी २.०० वाजेपर्यंत १ कोटी ३४ लाखांचे ठेव संकलन झाले.
स्वरूपानंद पतसंस्थेने चांद्रयान – 3 मोहिमेचे यश विक्रम ठेव योजनेमाध्यमातून साजरे केले. विक्रम ठेव योजनेला मिळालेला प्रतिसाद हा एक प्रकारे राष्ट्रभावनेशी जोडलेल्या विचार प्रवाहाचा प्रचंड प्रतिसाद म्हणावा लागेल. सहकार जगतानेही सक्रिय राहत प्रत्येक संधी साधली पाहिजे. स्पर्धेच्या या युगात राष्ट्रभावनेशी जोडलेल्या मुद्द्यांना महत्त्व देत व्यावसायिक प्रगती साधता येते हे विक्रम ठेव योजनेच्या प्रचंड यशातून अधोरेखित झाले.
विक्रम ठेव योजनेत ६ कोटी ९० लाख जमा करत असताना अल्पकालावधीत प्रॉस्पेक्टिव्ह ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता येते आणि प्रतिसाद प्राप्त करता येतो याची प्रचिती घेता आली. संस्थेच्या विश्वासार्ह स्थानाची पावती परत परत घेताना नवा आत्मविश्वास प्राप्त झाला. संस्थेच्या ठेवी २८५ कोटी पर्यंत पोहोचल्या म्हणजे ३०० कोटीसाठी आता केवळ १५ कोटींचे अंतर पार करायचे. हे अंतर नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मनोमन निश्चित करत आहे असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.
२८५ कोटींच्या ठेवी, १९८ कोटींची कर्ज, ९९.५७% वसुली, 0 % NPA, ६२% सीडी रेशो, २७% CRAR चे प्रमाण, १२९ कोटींच्या गुंतवणुका, ४० कोटींचा स्वनिधी, १७ ब्रँचेस, महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र आणि ४३ हजार सभासद असा कार्यविस्तार साध्य केलेली स्वरूपानंद पतसंस्था हे चित्र अधिक प्रभावी दिसण्यासाठी विक्रम ठेव योजनेचा प्रतिसाद महत्त्वपूर्ण आहे. या प्रतिसादाबद्दल सर्व गुंतवणूकदारांना मनःपूर्वक धन्यवाद देतानाच नजीकच्या काळात शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रयोग साहित्य अथवा काही उपयुक्त पुस्तके प्रदान करणार आहोत अशी माहिती ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.