
मानधन वाढीसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांचा संपाचा इशारा
जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन
रत्नागिरी: राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सन २०१४ पासून सुरु करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका चालवणारे चालक हे २०१४ सालापासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक १०८ वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्याप देखील तोडगा न निघाल्याने रत्नागिरीतील १०८ रुग्णवाहिकेवर काम करणार्या चालकांनी दि. १सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात इशारा दिला आहे. तसे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आले.
बीव्हीजी कंपनीकडून वाहन चालकांनी अत्यंत कमी पगार देत शोषण सुरू असल्याचा आरोप चालकांनी केला होता. याबाबतचे निवेदन वाहनचालकांनी आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांना दिले होते. याबाबत काय तोडगा काढण्यात येईल यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत यांनी दि.२५ जुलै रोजी बीव्हीजी कंपनीचे संबंधित प्रकल्पाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि वाहनचालक यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीव्हीजी कंपनीने वाहन चालकांसोबत एक बैठक घेत त्यांच्या मागण्याबाबत योग्य विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता महिना होऊन गेला तरी देखील वाहनचालकांसोबत कोणतीही चर्चा बीव्हीजी कंपनीने केली नाही.
त्यानंतर १०८ रुग्णवाहिका वाहनचालक संघटनेने कंपनी सोबत पत्रव्यवहार करत वाहनचालकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात यावे असे निवेदन कंपनी व्यवस्थापनाला दिले होते. परंतु कंपनी प्रशासनाने रुग्णवाहिका चालकांच्या पत्राला कोणतीही दाद दिली नाही. कंपनीच्या या भूमिकेवर संतापलेल्या महाराष्ट्रातील रुग्णवाहिका १०८ वाहनचालक संघटनेने दि. १ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याला रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभागी होत असल्याचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ. संघमित्रा फुले यांना दिले आहे.यावेळी बहुतांशी रुग्णवाहिका चालक उपस्थित होते.
