
जिल्हा बँकेमार्फत सभासदांना 15 टक्के लाभांश जाहीर
एकत्रित चार हजार कोटींचा व्यवसाय, 2411 कोटी रुपयांच्या ठेवी जमा: डॉ.तानाजीराव चोरगे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सभासदांना यंदा 15 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून पुढील वर्षी तीस टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे यांनी केली. जिल्हा बँकेचा एकत्रित व्यवसाय चार हजार कोटी रुपयांचा झाला असून 2411 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. 1662 कोटी रुपयांचा कर्जव्यवहार बँकेने पूर्ण केला असून 276 कोटी रुपयांचा स्वनिधी बँकेकडे आहे. जिल्हा सलग बारा वर्षे अ ऑडीट वर्ग मिळाला असून सलग 11 वर्षे नक्त एनपीएचे प्रमाण शुन्य टक्के असल्याची माहिती डॉ.चोरगे यांनी दिली.
माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेला मार्गदर्शन करताना डॉ.चोरगे बोलत होते. ज्येष्ठ संचालक तथा आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव, कार्यकारी संचालक श्री.अजय चव्हाण, संचालक मंडळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे आहे. सोसायट्यांनी आपल्या सभासदांना लाभांश देण्याइतपत आर्थिक व्यवहार करावा असा सल्ला डॉ.चोरगे यांनी दिला. सर्व सोसायट्यांना उभारणी देणे खऱ्या अर्थाने गरजेचे आहे. त्यांच्यामार्फत आर्थिक व्यवहार वाढला तरच खऱ्या अर्थाने सहकार चळवळ अधिक प्रमाणात वृद्धींगत होणार आहे. भविष्यात सहकारी सोसायट्यांनी आपला आर्थिक व्यवहार वाढवून स्वावलंबी व्हावे असे आवाहन डॉ.चोरगे यांनी केले.
जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय अद्यापही कायम आहे. तरूण वर्गाने शेतीकडे दुर्लक्ष करून मुंबई उपनगरात व्यवसाय, नोकरीचा पर्याय स्वीकारल्याने भातशेती धोक्यात आली आहे. भातशेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सोसायट्यांसह सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. भातशेतीचा व्यवसाय टिकणे काळाची गरज आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे डॉ.चोरगे यांनी सांगितले. जिल्हा बँकेने निर्लेखित केलेल्या 103 कोटी रुपयांपैकी 58 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. जवळपास 56 टक्के वसुली संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केल्याने डॉ.चोरगे यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा बँकेची आर्थिक प्रगती सातत्याने वाढत असून यात सर्वांचे मोलाचे योगदान असल्याचे डॉ.चोरगे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेला होणाऱ्या निव्वळ नफ्याचे प्रमाण भविष्यात दरवर्षी वाढणार आहे. कर्जवसुलीचे प्रमाण वाढले असून जिल्हा बँकेला मिळणाऱ्या पुरस्कारामध्येदेखील वाढ होत आहे. नाबार्ड, आरबीआय, सहकार विभाग, तज्ञ संचालक, लेखा परीक्षक यांच्यामार्फत होणाऱ्या तपासणीला जिल्हा बँकेला सामोरे जावे लागत आहे. सहकार विभागाचे सर्व नियम, निकष कायम ठेवून जिल्हा बँकेचे कामकाज अधिक पारदर्शकपणे सुरू असल्याचे डॉ.तानाजीराव चोरगे यांनी सांगितले. कार्यकारी संचालक श्री.अजय चव्हाण यांनी विषयपत्रिकेवरील प्रस्तावांचे वाचन केल्याने उपस्थितांनी ते मंजूर केले. सरव्यवस्थापक डॉ.सुधीर गिम्हवणेकर यांनी आभार मानले.