
जिल्ह्याला ९६५ नव उद्योजक घडवण्याचे लक्ष्य
मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम ; प्रस्ताव मंजूर करण्याची कसरत
रत्नागिरी:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला यंदा ९६५ इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा जास्त उद्दिष्ट मिळाले असले तरीही गेल्या वर्षी बँकांच्या धोरणामुळे ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण करता आले होते. यावर्षी उद्दिष्ट वाढवून दिल्यामुळे कर्जप्रस्ताव मंजूर करवून घेण्याची कसरत जिल्हा उद्योग केंद्राला करावी लागणार आहे.
गेल्या वर्षी या योजनेसाठी जिल्हा उद्योग केंद्राला ८०० प्रस्तावांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेसाठी सुमारे २३ हजार उद्योजकांनी प्रस्ताव दाखल केले होते. यात महिला उद्योजकांची संख्या अधिक होती. मात्र, ही शासनाची मार्जिन मनी अनुदानाची योजना असूनही सुरुवातीपासूनच सर्वच बँकांनी प्रस्ताव नाकारण्याचे धोरण अवलंबले. याबाबत पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या बँकांना खडे बोल सुनावूनही त्यांच्या आदेशाला हरताळ फासत या बँकांनी जवळपास ७० टक्के प्रस्ताव नाकारले. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्राचे जेमतेम ५५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. गेल्या आर्थिक वर्षात केवळ ४३९ प्रस्ताव मंजूर झाले. यात ३१७ प्रस्ताव महिलांचेच होते. नाकारलेल्या प्रस्तावांमध्ये कागदपत्रांतील त्रुटी, सिबिल स्कोअर ही कारणे मोठ्या प्रमाणावर दाखविण्यात आली होती.