
रत्नागिरी- भाजपाच्या कार्यकर्त्यांसह देशभक्तांची तिरंगा बाईक रॅली
रत्नागिरी:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त भाजपाच्या कार्यकर्त्यांसह देशभक्तांनी अनाम वीरांच्या सन्मानार्थ शनिवारी रत्नागिरीत तिरंगा बाईक रॅली काढली. अमृतकाळाच्या समारोप करताना राष्ट्रीय प्रेरणा मिळावी आणि ती शतकमहोत्सवी वर्षापर्यंत वृद्धिंगत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने अनेक कार्यक्रम दिले आहेत. यापैकी तिरंगा बाईक रॅली होती. यात ३५० हून अधिक कार्यकर्ते, देशभक्त सहभागी झाले.
यानिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळ माने यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. रत्नागिरी शहरात झालेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास ३५० हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आपल्या दुचाकीवर तिरंगा फडकावत, घोषणा देत राष्ट्रीय गीते गुणगुणत भव्य रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला.
सामाजिक सलोखा आणि बंधुता जपत या रॅलीमध्ये सर्व जातीधर्मांचे, विचारांचे, विविध पक्षांचे लोक उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मारुती मंदिर येथून रॅली सुरू झाली. नंतर साळवी स्टॉपपासून पुढे नेण्यात आली. त्यानंतर पुन्हा तिथून खाली येताना माळनाका येथे स्व. शामराव पेजे, जिल्हा रुग्णालयासमोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लक्ष्मीचौक येथे वीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपा जिल्हा कार्यालयासमोर रॅलीची सांगता झाली.
रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळ माने यांनी रॅलीचे जिल्हा संयोजक डॉ. ऋषिकेश केळकर व विधानसभा संयोजक सुशांत पाटकर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, सर्व प्रकारचे भेदाभेद दूर करण्याचा संदेश आपल्याला तिरंगा देतो. एकोपा आणि बंधुभाव आपल्या देशाचा आत्मा असून आपला तिरंगा ध्वज हे त्याचेच प्रतीक आहे. जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, युवा पिढीच्या खांद्यावर जबाबदारी दिली तर ते किती प्रभावी आणि सुसूत्रतेने नियोजन करू शकतात हे आज रत्नागिरीकरांनी पाहिले आहे. त्यांचे टीमवर्क आणि समन्वय पाहण्यासारखा होता. आपल्याला या अभियानातील सर्व कार्यक्रम याच पद्धतीने यशस्वी करून राष्ट्रभक्तीचा वसा पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करायचा आहे.
संयोजक डॉ. ऋषिकेश केळकर यांनी सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आभार मानले व पुढील कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी ‘तिरंगा बाईक रॅली’च्या यशस्वी नियोजनाबद्दल युवा पदाधिकाऱ्यांचे व संयोजकांचे फोन करून कौतुक केले.