
कोकण विभागात ३२ लाख ४२ हजार रोपे
रत्नागिरी, ः कोकणातील पाच जिल्हयातील २५ रोपवाटीकांमध्ये ३२ लाख ४२ हजार रोपे सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जाणार असून नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
जून ते सप्टेंबर हे पावसाचे महिने असल्याने या कालावधीत वृक्षलागवड केल्यास त्यांना नैसर्गिकरित्या मुबलक स्वरुपात पाणी मिळते. त्यामुळे लागवड केलेली रोपे सहजतेने जगतात. या कालावधीत जनतेला वनीकरणाचे महत्व पटावे, वृक्षलागवडीबद्दल उत्साह वाढावा, नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षलागवड करावी या उद्देशाने वन विभागामार्फत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन वन महोत्सव साजरा केला जातो. कोकण विभागातील समाजिक वनीकरण अंतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. या वनमहोत्सवात सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध आहेत. या मध्ये ९ महिन्याचे अ दर्जाचे एक रोप जे सर्वसाधारण कालावधीत ३१ रुपयात मिळते ते रोप या वन महोत्सवा दरम्यान २० रुपयात उपलब्ध आहे. ब दर्जाचे २५ रुपयात मिळणारे रोप १२ रुपयात, क दर्जाचे २३ रुपयात मिळणारे रोप १० रुपयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे १८ महिन्याचे अ दर्जाचे एक रोप जे सर्वसाधारण कालावधीत ७९ रुपयात मिळते ते रोप ५० रुपयात, ब दर्जाचे ६३ रुपयात मिळणारे रोप ३० रुपयात, क दर्जाचे ५७ रुपयात मिळणारे रोप २५ रुपयात उपलब्ध आहे. तसेच १८ महिन्यांवरील अ दर्जाचे एक रोप जे सर्वसाधारण कालावधीत १३५ रुपयात मिळते ते रोप ६५ रुपयात, ब दर्जाचे १०३ रुपयात मिळणारे रोप ५० रुपयात, क दर्जाचे ९२ रुपयात मिळणारे रोप ४० रुपयात उपलब्ध आहे. या वर्षी रोपे निर्मितीवेळी, बियाणांचा स्त्रोत, बियाणांची प्रतवारी व उपचार, रोपांची सुदृढता या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दऊन कृषि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही रोपे तयार करण्यात आली आहेत. ठाणे जिल्हयात ९, रायगड ६, रत्नागिरी ८ आणि सिंधुदूर्ग २ अशा कोकण विभागात एकूण २५ रोपवाटीका उपलब्ध आहेत. वन महोत्सवादरम्यान उपलब्ध असलेल्या सवलतीच्या दरातील रोपांची खरेदी करुन नागरिकांनी वृक्षलागवड करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी केले आहे.
रोपांची आगाऊ मागणी करा
शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना वृक्ष लागवड करावयाची आहे. अशा यंत्रणांकडे रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसल्यास, अशा यंत्रणांना या वन महोत्सव कालावधीत रोपांचा मोफत पुरवठा संबंधित रोपवाटिकेत केला जाईल. यासाठी अशा यंत्रणांनी लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे मागणी करावी लागेल.