
रत्नागिरी शहरातील खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन
रत्नागिरी :मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहरातील रस्त्यांची खड्ड्यामुळे दुरवस्था झाली आहे. या विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे शहरातील खड्ड्यांची छायाचित्रे हातात धरुन ‘ खड्डे घ्या खड्डे नगरपरिषदेचे खड्डे’ अशा घोषणा देत खड्ड्यांचा प्रतिकात्मक लिलाव करत निषेध व्यक्त केला. हे आंदोलन मनसे रस्ते साधन सुविधा वआस्थापना विभाग जिल्हासंघटक अजिंक्य केसरकर व रत्नागिरीचे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
नागरिकांना कर भरुनही अशा रुपात मिळणारा परतावा व होणारा त्रास,अपघात हे थांबून रस्ते दुरूस्तीसाठी चिरा न वापरता डांबरीकरण करून या त्रासातून मुक्तता करावी अशी भूमिका केसरकर यांनी मांडली. तर मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी रत्नागिरीकरांच्या होणाऱ्या मनस्तापाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असून यानंतर तरी सुस्त लोकप्रतिनिधींना जाग येऊन ही परिस्थिती सुधारावी अशी आशा व्यक्त केली. आठवडाबाजार येथे उपस्थित नागरिकांनी या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत कौतुक केले.
आंदोलनप्रसंगी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अजिंक्य केसरकर ,तालुका संघटक सतीशजी खामकर, उपतालुका संघटक प्रशांत कुडाळकर,शहर संघटक सुशांत घडशी,मनसे उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण महिला उपशहरअध्यक्ष शिल्पाताई कुंभार, महिला शहर सचिव सारिकाताई शर्मा,शाखाध्यक्ष साहिल वीर, मनविसे तालुकाध्यक्ष चैतन्य शेंड्ये, मनविसे माजी शहरअध्यक्ष राज परमार, अक्षय चव्हाण, सौरभ गायकवाड,अनिकेत जाधव,सुनील पारकर आदी महाराष्ट्र सैनिक -पदाधिकारी उपस्थित होते.
