
शास्त्री खाडीशेजारी दोन दिवस पुरसदृश्य स्थिती; भातशेती पाण्याखाली
रत्नागिरी :पावसाचा जोर, खाडीभागातील पुराचे पाणी येथील शेतकऱ्यांची पाठ काही सोडत नाही. गत पंधरवड्यात तब्बल सहा वेळा येथील शास्त्री खाडी दुथडी भरून पुराचे पाणी येथील बाजारपेठेसह खाडी लगतच्या भातशेतीत व सखल भागात घुसल्याने येथील शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे.
पावसाचा जोर वाढताच येथील शास्त्री खाडीच्या पाण्यात वाढ होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. तर पावसाने उसंत घेतल्यावर पुराचे पाणी भरत आहे. गेले पंधरा दिवसात किमान सहा वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पावसाचा जोर वाढल्याने काल मंगळवारी खाडीतील नेहमीचे पाणी वाढलेले असताना पुन्हा बुधवारी सकाळपासून पाण्यात वाढ होऊन येथील खाडी दुथडी भरून बाजारपेठसह खाडी किनाऱ्यालगत असलेल्या परचुरी, फुणगूस, कोंडये, दावखोल, मांजरे, मेढे तसेच खाडी पलीकडील डिंगणी, पिरंदवणे, करजुवे या गावातील भातशेतीमध्ये पाणी घुसल्याने सतत पंधरा दिवस लावणी कामे खोळंबली आहेत. तर काहींची लावणी पूर्ण झाली आहेत, ती पाण्याखाली गेल्याने त्याचा फटका बसून नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरीवर्ग चांगलाच धास्तावला आहे.
आज सकाळपासूनच पावसाच्या संततधार धारा बरसत असल्याने पाण्याच्या पातळीतही तेवढ्याच वेगाने वाढ होत असून पावसाचा जोर कमी झाला नाही तर गत दोन वर्षापूर्वीच्या अतिवृष्टीची सीमा पार करेल की काय? अशा भीतीने येथील जनतेसह शेतकरी वर्गाच्या मनात धाकधूक आहे.