
राजापूर, लांजा तालुक्यातील सहा दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील तीन व लांजा तालुक्यातील तीन अशा दरडप्रवण सहा गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच राजापुरातील गाळ उपशामुळे काही प्रमाणात पुराचा धोका कमी झाल्याचे निदर्शनास आले असल्याने अर्जुना व कोदवली नद्या 100 टक्के गाळ मुक्त करण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी आज प्रांताधिकारी कार्यालयात राजापूर व लांजा तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी धोपेश्वर गावातील दरडप्रवण क्षेत्राला भेट देवून पहाणी केली.
जिल्ह्यातील एकूणच पूर परिस्थितीचा वरिष्ठांनी आढावा घेतल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यातील दरड प्रवण गावांतील ग्रामस्थांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पूरग्रस्त भागातील नद्यांचा गाळ काढून पुराचा धोका कमी कसा करता येईल, यासाठीही नियोजन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. राजापूर तालुक्यातील धोपेश्वर खंडेवाडी, वडदहसोळ हळदीची फांदी व परूळे पाटील वाडीतील पाच घरे हा दरडप्रवण क्षेत्रात येणारा अत्यंत धोकादायक भाग आहे. तसेच लांजा तालुक्यातील खोरनिनको मुसळेवाडी, इंदवटी बाईतवाडी व वनगुळे या गावांचा समावेश आहे. या सहा गावांतील ग्रामस्थांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
राजापुरातील धोपेश्वर गावातील दरडप्रवण खंडेवाडी, गुरववाडी व नाडणकरवाडी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पहाणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. अतिवृष्टी काळात ग्रामस्थांनी या ठिकाणी राहू नये प्रशासनाने व्यवस्था केलेल्या जागेत तात्पुरते स्थलांतरित होण्याबाबत त्यांनी आवाहन केले.
राजापुरातील अर्जुना व कोदवली नद्यांतील गाळ उपशामुळे काही प्रमाणात पुराचा धोका कमी झाला आहे. जर 100 टक्के गाळ उपसला तर हा धोका कायमचा टळू शकतो. याबाबतही शासनाकडून प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचाही प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार आहे. राजापुरातील पुररेषेचेही नव्याने सर्वेक्षण करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, लांजा तहसीलदार प्रमोद कदम, राजापूर मुख्याधिकारी प्रशांत भोसले, गटविकास अधिकारी विवेक गुंडपाटील आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.