
‘जगबुडी’ने ओलांडली धोक्याची पातळी, दुकानं पाण्याखाली
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या जगबुडी नदीनं आज सकळी सात वाजता धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या नदीची पणीपातळी 7.45 मीटर एवढी आहे. या नदीची धोका पातळी सात मीटर आहे. म्हणजेच नदीत सध्या धोका पातळीपेक्षाही अधिक पाणी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराची परिस्थिती बिकट बनली आहे. मटन-मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरलं आहे. सात ते आठ दुकानं पाण्याखाली गेली आहेत. खेडमधील खाडीपट्ट्या विभागात जाणारे तसेच नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
त्यामुळे आता पावसाचा जोर असाच कायम राहिला तर खेडच्या बाजारपेठेतही पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड नगर प्रशासनाने तसेच तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीच्या किनाऱ्यावर कुणीही जाऊ नये अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.