
नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा
: निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
रत्नागिरी, : केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय नियोजन करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले.
नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची नियामक परिषद बैठक झाली. बैठकीला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेंच्या प्राचार्य अनुपमा तावशिकर, जिल्हा सांख्यिकी उपसंचालक निवासी यादव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य म.म. जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी राहूल देसाई उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी स्वागत करुन विषय वाचन केले. त्या म्हणाल्या, देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करणे हा योजनेचा उद्देश आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 या कालावधित ही योजना राबविण्यात येत आहे. प्रौढ शिक्षण ऐवजी सर्वांसाठी शिक्षण ही संज्ञा वापरली जाणार आहे.
वय वर्षे 15 ते 35 हा वयोगट प्रथमत: या अभियानात सामावून घेवून त्यांना साक्षर करणे हे या अभियानाचे मुख्य लक्ष आहे. त्यानंतर 35 व त्यापेक्षा अधिक वयोगटाचा विचार करण्यात येणार आहे. सन 2022-23 मध्ये जिल्हयात 6 हजार 336 तर 23-24 मध्ये 7 हजार 170 असे एकूण 13 हजार 506 निरक्षर आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी म्हणाले, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसीलदारांनी आपल्या स्तरावर बैठक घेवून नियोजन करावे. गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावनिहाय सर्वेक्षण करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा.