
राजापूरात सलग चौथ्या दिवशी पूरस्थिती कायम
राजापूर: राजापूर शहरासह तालुक्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून गेल्या चार दिवसांपासून नद्यांच्या पाण्याच्या पातळीने ओलांडलेली धोक्याची पातळी आजही कायम राहीली आहे. त्यामुळे राजापूर शहरात सलग चौथ्या दिवशी पूरस्थिती कायम राहीलेली आहे. शहरातील वरचीपेठ चिंचबांध रस्ता व कोंढेतड रस्ता, गणेश घाट परिसर, शिवाजीपथ रस्ता पाण्याखाली गेला आहे. कोंढेतड पुलावरील वाहतुक ठप्प झाली आहे. तर शीळ गोठणे दोनिवडे चिखलगाव रस्ता पुन्हा पाण्याखाली गेला आहे. पुराच्या पाण्याने जवाहरचौक परिसरात प्रवेश केला आहे. त्यामुळे व्यापारी नागरिक सतर्क झाले आहेत.
तर तालुक्याच्या पुर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पर्जन्यवृष्टीत शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान येळवण येथील ग्रामस्थ चंद्रकांत देशपांडे यांच्या घरावर वटवृक्ष कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने तालुक्यात संततधार धरली आहे. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी अर्जुना आणि कोदवली नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारी दुपारनंतर काहीशी पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे अर्जुना नदी पात्र हळहळु ओसरू लागले होते. शिळ चिखलगाव मार्गही वाहतुकीसाठी मोकळा झाला होता. मात्र सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरल्याने व रात्री संततधार पाऊस पडल्याने सकाळी पुन्हा अर्जुना आणि कोदवली नदयांनी ईशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. तर शहरात खर्ली नदीपात्रही तुडुंब भरले असून जवाहचौकातील कोदवली नद्यांच्या काठावरील टपर्या पूराच्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर, पहाटेच्या दरम्यान जवाहरचौक परिसरामध्ये घुसलेले पूराचे पाणी सकाळी ओसरले होते. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा पूराचे पाणी जवाहरचौक परिसरामध्ये वाढले आहे. सायंकाळी पुराच्या पाण्याने जवाहरचौक परिसरात आगेकुच सुरू ठेवली होती.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये सततधारा पाऊस पडत आहे. पावासाचा जोर आजही कायम राहीलेला आहे. त्यातून, शहरातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेली वाढ आजही कायम राहीलेली आहे. त्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून नद्यांच्या पाण्याच्या पातळीने ओलांडलेली इशारा पातळी आजही कायम राहीलेली आहे. त्यातून, पूरस्थिती कायम राहीलेली आहे. सकाळच्यावेळी नद्यांच्या काठाबरोबर असलेेल्या पूराच्या पाण्याने दुपारपर्यंत जवाहरचौक परिसारमध्ये धडक दिली होती. त्यातंनतर, सातत्याने पाण्यामध्ये वाढ होत होती. त्यामुळे वाढत्या पूरस्थितीने बाजारपेठेतील व्यापारी सतर्क झाले आहेत. दुकानातील मालाचे नुकसान होवू नये म्हणून माल सुरक्षित ठिकाणी हलविण्याला सुरूवात केली होती.
पुराचे पाणी शहर बाजारपेठेत शिरण्याच्या शक्यतेमुळे व्यापारी, नागरिक आणि प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाचे वतीने नागरिकांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.