
“एनडीआरएफ”ची टीम चिपळुणात दाखल
चिपळूण:पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासह मदतकार्य राबविण्यासाठीची तयारी प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) तुकडी शनिवारी चिपळूण शहरात दाखल झाली आहे. या तुकडीमध्ये तीन अधिकारी आणि १८ जवान आहेत.
आतापर्यंतचा इतिहास पाहता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालतो. २०२१ मध्ये जुलैअखेर अतिवृष्टी झाली होती. राज्य शासनाने त्याची दखल घेत मागील दोन वर्षांपासून पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफचे जवान चिपळूणला पाठवले आहेत.
चिपळूणमध्ये एनडीआरएफची तुकडा पाठवण्याबाबत प्रशासनाकडून राज्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार एनडीआरएफच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक कुमार, रिशभ शर्मा आणि बिभीषण मोरे हे अधिकारी या तुकडीमध्ये आहेत. चिपळूण नगर परिषदेने बोटीसह इतर आवश्यक बचाव कार्याच्या साधनांनी उपलब्धता केली आहे. काही साधने एनडीआरएफच्या तुकडीने उपलब्ध केली आहेत.