
वेरळ, खेडमधील आथ्रायटीस व्याधीग्रस्ताला व्हिलचेअर प्रदान
रत्नागिरी : वेरळ (ता. खेड) येथील २६ वर्षीय दिव्यांग जनार्दन बाबु ढेबे याला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) व्हिलचेअर भेट देण्यात आली. गेली काही वर्षे तो बिछान्यावरच झोपून राहत होता, आता व्हिलचेअरमुळे सर्वत्र फिरू लागला आहे. त्याला आता जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.
जनार्दन आरथ्रायटीस या व्याधीने ग्रस्त असून दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. त्याला अजिबात चालता येत नाही. तो जन्मत: अगदी सुदृढ होता, अकरावीपर्यत चांगले चालत होता. पण नंतर चालताना पाय दुखायला लागले आणि त्याचे दोन्ही पायांचे खुबे बाद झाले, दोन्ही गुडघे खराब झाले. शिक्षण थांबले आणि तो घरातच झोपून राहू लागला.
घरच्यांच्या मदतीशिवाय जनार्दन काहीच करू शकत नव्हते. त्याच्या दोन्ही खुब्यांचे सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया पुणे येथे झाली. पण फारसा फरक पडला नाही. दोन्ही गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. पण कोरोनाच्या काळात त्याच्या आईचे निधन झाले. सध्या त्याचे वडील आणि आजोबा त्याला मदत करतात. त्याचा एक मोठा भाऊ मुंबईला कंपनीत नोकरी करतो तर दुसरा छोटा भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. घरच्यांनी त्यांच्यासाठी एक व्हीलचेअर घेतली पण ती त्याला ती सोयीस्कर झाली नाही. बसायला, चालवायला त्रास होत होता.
आरएचपी फाउंडेशनच्या खेडमधील सदस्य श्रध्दा आंब्रे यांच्याकडून जनार्दनला संस्थेबद्दल माहिती मिळाली. जनार्दनच्या वडिलांनी रत्नागिरीत आरएचपी फाऊंडेशनच्या संस्थेत येऊन जनार्दनची पूर्ण माहिती सांगितली आणि नावनोंदणी केली. आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांनी संस्थेतर्फे जनार्दनला सोयीस्कर होणारी व्हीलचेअर दिली. त्यामुळे जनार्दनला कोणाच्या मदतीशिवाय बेडवरुन उतरून व्हीलचेअरवर बसता येऊ लागले आहे. व्हीलचेअर चालवता येते त्यामुळे तो आता सर्वत्र फिरू लागला आहे. त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. जीवन जगण्याची नवी उमेद त्याच्यात निर्माण झाली आहे. त्याचे समाधान त्याच्या चेहर्यावर दिसते.