
सेवा हक्क डावलून तब्बल 10 वर्षे वेतनापासून वंचित
तरवळ येथील सोमेश्वर विद्यालयातील सोमनाथ जगताप नामक शिक्षकावर उपासमारीची वेळ
रत्नागिरी :अनुशेषानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून नेमणूक केली असूनही केवळ अनुसूचित जमातीचा असल्याने गेली 10 वर्षे सोमनाथ महारू जगताप या शिक्षकाला वेतनापासून वंचित ठेवण्यात आल्याचे ॲड.एस. बी. पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यापकरणी जबाबदार मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
माळनाका येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेला ॲड. पाटणकर यांच्यासमवेत अन्यायग्रस्त शिक्षक सोमनाथ जगताप हे देखील उपस्थित होते. जगताप हे आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय पो. तरवळ, रत्नागिरी या शासनमान्य अनुदानित विद्यालयात इ.9 वीच्या दुसऱ्या विनाअनुदानित तुकडीवर 2013 पासून अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांची नियुक्ती ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून झाली आहे.
सदर शाळेमध्ये अनुदानित विभागाकडे 2 पदे रिक्त असताना या रिक्त पदावर 1 जून 2021 रोजीच्या नियमानूसार त्यांचे विनाअनुदान तुकडीवरून अनुदानित तुकडीवर समायोजन करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण त्यांना डावलून खुल्या प्रवर्गातील शिक्षिकेस विनाअनुदान तुकडीवरून अनुदानित तुकडीवर समायोजन करून त्यांचे वेतन सुरू केल्याचे म्हणणे आहे. त्यानंतर अनुदानित तुकडीवर कार्यरत असणारे प्रकाश मुठाळ यांचे निधनाने रिक्त पदावर त्यांचे विनाअनुदानित तुकडीवरून अनुदानित तुकडीवर समायोजन करणे गरजेचे होते. पण सेवा कनिष्ठ शिक्षकेस त्या पदावर नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे शिक्षक जगताप यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करून त्यांना 1 जून 2021 पासून वेतनापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असून त्यांचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक खच्चीकरण झाले असल्याचे ॲड. डॉ.सुभाषचंद्र पाटणकर यांनी सांगितले.
अनुसुचित जमाती शिक्षकावर अन्याय करून खोट्या व बोगस कागदपत्रांचे आधारे टिईटी परीक्षा लागू नसल्याचा बनाव करण्यात आला आहे. मुलाखतीपूर्वीचा बोगस नवीन नियुक्ती आदेश दाखवून शिक्षक मान्यता आणि शासनाची दिशाभूल करून अतिरिक्त यादीमध्ये नसलेल्या शिक्षिकेचे समायोजन केलेले आहे. आरक्षणानुसार नेमणूक असलेले प्रथम प्राधान्याने 1 जून 2021 पासून अनुदानित या रिक्त पदावर सोमनाथ जगताप यांची नेमणूक करावे. आरक्षण डावलून/सेवा ज्येष्ठता डावलून गैरमार्गाने वेतन घेत असलेल्या शिक्षिकांकडून वेतन वसूल करावे. तसेच खोटी कागदपत्रे करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संबधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.