
पालशेत येथील बार्ज हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आंबोशी नदीच्या मुखाजवळ अडकलेली बार्ज हटविण्यासाठी गुहागरच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी ती बार्ज हटविण्याचे आदेश रत्नागिरीच्या बंदर विभागाला दिले आहेत.
पालशेत समुद्रकिनारी आंबोशी नदीच्या मुखाजवळ समुद्रामधून गेल्या वर्षी १८ जुलै २०२२ रोजी ही मालवाहू नौका (बार्ज) वाहून आली होती. ती हटवावी, अशी मागणी पालशेत-निवोशी ग्रामपंचायतीने पत्राद्वारे गुहागरच्या तहसीलदारांकडे केली होती. त्याची दखल घेत बार्ज सीबी १००-०१ ची तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी रत्नागिरी बंदर विभाग कॅप्टन संजय उगलमुले यांच्यासमवेत २ दिवसांपूर्वी पाहणी केली होती. त्यानंतर पालशेत गावातील या आपत्तीदर्शक बार्जमुळे होणाऱ्या परिणामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी पत्र पाठवले होते. त्यावर त्वरित कार्यवाही झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी बार्ज हटविण्याचे आदेश दिले आहेत.