
दापोली अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाची मदत – उदय सामंत
रत्नागिरी:- आसूद (ता. दापोली) येथे काल झालेल्या अपघातातील मृतांच्या एका वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
ट्रक आणि वडाप यांची समोरासमोर टक्कर झाल्याने काल झालेल्या भीषण अपघातात ८ जण मृत्युमुखी पडले. दापोली-हर्णै राज्य मार्गावर आसूदच्या जोशी आळीजवळील वळणावर काल (दि. २५ जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास ट्रक आणि टाटा मॅजिक प्रवासी जीप यांची समोरासमोर टक्कर होऊन चालकासह पाच जणांचा मृत्यू झाला, तर उपचार सुरू असताना तिघांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी जीप (क्र. एमएच 08 -5208) आणि दापोलीकडे निघालेला ट्रक यांच्यात ही धडक झाली. अनिल (बॉबी) आपली जीप घेऊन दापोलीतून आंजर्ल्याकडे प्रवासी घेऊन निघाले होते. त्यांचे वाहन आसूदच्या जोशी आळीनजीक असलेल्या वळणावर आले. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकने बाहेरून वळण घेतले. तेव्हा जीपवर ट्रक आदळला. ट्रकने जीपला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले. अपघातातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अनिल सारंग (चालक, वय ४५, हर्णै), संदेश कदम (५५), स्वरा संदेश कदम (८), मरियम काझी (६४), फराह काझी (२७, सर्व रा. अडखळ) अशी जागीच मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. वंदना चोगले (३४, पाजपंढरी), मीरा बोरकर (२२, पाडले) यांचे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. सामीया इरफान शिरगावकर हिचेही निधन झाले. त्यामुळे मृतांचा आकडा ८ वर पोहोचला. अपघातात सपना संदेश कदम (३४, अडखळ), श्रद्धा संदेश कदम (१४, अडखळ), विनायक आशा चोगले (पाजपंढरी), भूमी सावंत (१७), मुग्धा सावंत (१४), ज्योती चोगले (९. पाजपंढरी) यांच्यावर दापोली उपजिल्हा आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक आहिरे पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी दाखल झाले. अपघातानंतर अडखळ, हर्णै, पाजपंढरी तसेच दापोलीकरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघात घडताच ट्रकचालक आणि क्लीनरने पळ काढला. दापोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
या अपघातातील मृतांच्या वारसाला ५ लाखाची मदत, तर जखमींचा सर्व खर्च शासन करणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर तत्काळ त्यांनी कालच्या अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचे जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.