
वीज पडून घराचे नुकसान ; सत्कोंडीतील घटना
रत्नागिरी:- मुसळधार सरींची बरसात झाल्यामुळे मोसमी पाऊस सुरू झाल्याचा आनंद झाला; पण रविवारी (ता. २५) रत्नागिरीत पूर्ण दिवस कोरडा गेला, तर संगमेश्वरसह अन्य तालुक्यांमध्ये एखादी सर पडून गेली. पहिल्या पावसामध्ये झाड घरावर पडून पाच घरांचे, तर जयगड-सत्कोंडी येथे घरावर वीज पडून १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले.
रविवारी सकाळी ८.३० वाजपर्यंतच्या मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ८०.९६ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड ११२.६०, दापोली १०३.९०, खेड ८७.१०, गुहागर ४७.७०, चिपळूण ६२.००, संगमेश्वर ५५.९०, रत्नागिरी ८६.००, लांजा ११३.४०, राजापूर ६० मिमी नोंद झाली. शनिवारी सकाळपासून सरींचा पाऊस सुरू होता. रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी हुमणेवाडी येथील दीप्ती नितीन काताळे यांच्या घरावर वीज कोसळली. घराच्या कौलांचा चक्काचूर करत वीज घरात घुसली आणि श्रीमती दीप्ती यांना धक्का बसला.
यामध्ये त्यांच्या अंगात कौलांचे तुकडे घुसले आणि दोन्ही कानांना जबर दुखापत झाली. त्यांच्यावर वाटद आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वीज कोसळून झालेल्या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला आहे. दिप्ती काताळे व त्यांच्या शेजारी सरस्वती हुमणे या़ंच्या घरातील विजेची जोडणी, बोर्ड,
rainविविध उपकरणे व घरांची पडझड मिळून सुमारे एक लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेगवान वाऱ्यामुळे गावडेआंबेरे आणि कोळंबे येथे घरांचे अंशतः नुकसान झाले. हातखंबा येथील शिवाजी अंतू कारवे, गुणाजी अंतू कारवे यांच्या घरावर झाडाची फांदी कोसळून नुकसान झाले. शेतीसाठी पुरेसा पाऊस पडल्यामुळे भातपेरणीसह शेतीच्या अन्य कामांना सुरुवात झाली आहे.