
हेल्मेट सक्ती न करता जनजागृती करणार; रत्नागिरी आरटीओ विभागाची माहिती
रत्नागिरी :रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापरणे अत्यावश्यक आहे. मात्र आम्ही सक्ती न करता जनजागृती करतानाच वाहनधारकांचे समुदेशन करून हेल्मेट वापराबाबत आवाहन करण्यात येईल, अशी माहिती रत्नागिरी आरटीओ विभागाकडून देण्यात आली.
हेल्मेट वापरणे अनिवार्य असले तरी आधी याची जनजागृती करणे फार महत्त्वाचे असल्याने विशेषतः महामार्गावर हेल्मेट वापरणे अति आवश्यक आहे. शहरात सक्ती न करता वापरण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे रत्नागिरी आरटीओ कडून सांगण्यात आले. मुळात आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरले पाहिजे ही बाब पालकांसह वाहनधारकांना कळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हेल्मेट न घालता वेगाने वाहन चालवून शेकडो वाहनधारकांनी आपला जीव गमावला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतातच त्याचबरोबर जीव गमवावा लागतो. यामध्ये संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर दुःखात राहावं लागते. त्यामुळे हेल्मेट वापरण्याचे फायदे काय आहेत याविषयी जनजागृती करण्यावर आमची टीम लक्ष देणार आहे.
राज्याच्या परिवहन विभागाने हेल्मेट बाबत समुदेशन व जनजागृती करा, असे सूचना केल्या आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून ही मोहीम आता मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहे. रत्नागिरीत तर महामार्गावर हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि हेल्मेट वापरा म्हणून आवाहनदेखील करण्यात आले.