
मान्सून खोळंबला; पेरण्या रखडल्या
रत्नागिरी :वार्यांचा वेग मंदावल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेळापत्रक बिघडणार आहे. पहिल्या पंधरवड्यात भातशेतीच्या रोपवाटिकेसाठी आतापर्यंत ३० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. अनेकांना अजूनही पावसाची प्रतिक्षाच आहे. धूळपेरणीसह काही शेतकर्यांनी पाऊस पडेल, या आशेने पेरण्या केल्या; पण त्यांना बियाणे रूजून येण्याची चिंता सतावत आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता. १६) सरासरी ४४.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत १०१.६७ मिमी पाऊस झाला होता. यंदा मोसमी पावसाच्या सुरवातीलाच अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातून हे वादळ गुजरातकडे सरकले आहे. त्यानंतर वार्याचा वेग मंदावला आणि कोकणात पावसाचा जोरही कमी झाला आहे. मागील दोन दिवसात हलक्या सरी काही तालुक्यात पडल्या; पण त्याचा सर्वच गावांना उपयोग झालेला नाही.
खरीप हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात 67 हजार हेक्टरवर भातलागवड केली जाते. रोपवाटिकेसाठी 7 हजार हेक्टरवर पेरण्या होतात. 7 ते 10 जून या कालावधीत बहुसंख्य शेतकरी पेरणीची कामे पूर्ण करतात. यंदा पावसामुळे पेरण्या रखडल्या आहेत. धूळपेरण्या आणि दोन दिवसांपूर्वी ज्या भागात हलका पाऊस झाला तेथील शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत. हे प्रमाण ३० टक्केपर्यंतच आहे. पेरण्या उशिरा झाल्यामुळे भात लागवडीला दहा दिवस उशिर होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील शेतकरी संतोष भडवळकर म्हणाले, आम्ही धूळपेरण्या केलेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी थोडा पाऊस झाला होता. आता पावसाने पाठ फिरवली असून कडकडीत ऊन पडले आहे. परिणामी, पेरलेले बियाणे रूजून किती येईल याबाबत आम्हाला शंका आहे तर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुर्हाडे म्हणाल्या, पाऊस लांबल्यामुळे खरिपाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. पेरणीनंतर 21 दिवसांनी रोपांची लागवड केली जाते.