
स्मार्टअंतर्गत जिल्ह्यासाठी 24 प्रकल्पांचे उद्दीष्ट
रत्नागिरी, ः शेतमालावर स्थानिकस्तरावर म्हणजे गावातच प्रक्रिया होण्याच्या उद्देशाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्राम परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट) कोकणात १२० प्रकल्पांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी २४ प्रकल्प करावयाचे आहे, असे जिल्हा ऋषी अधीक्षक सुनंदा कुर्हाडे यांनी सांगितले.शेतकर्यांमध्ये समूहस्तरावर मूल्यवर्धनाला प्रोत्साहन मिळावे याकरिता राज्य सरकारकडून स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. प्रकल्पातून उद्योगाच्या उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या सरासरी ६० टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे. शेतकरी कंपन्या, बहुद्देशीय संस्था तसेच महिला समूहांना देखील यात समावेशीत करून घेण्यात आले. संस्था आणि स्वयंसहाय्यता समूहांचे रूपांतर शेतकरी कंपन्यांमध्ये रुपांतरणाची अट घालण्यात आल्या होती.
त्यानंतरच्या त्यांच्या प्रकल्प आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. बांधकाम व विविध टप्प्यांवर या अनुदानाचा वापर कंपन्यांना करता येईल. शेतकरी कंपन्यांना प्रकल्पासाठी कर्ज मिळण्यात अडचणी येऊ नये याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रासोबत समन्वय ठेवण्यात येत आहे. कोकणात १०२ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी ८४ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात १८, पालघरमध्ये २३, रायगडमध्ये २५, रत्नागिरीत २४ आणि सिंधुदुगमध्ये १२ प्रकल्प प्रस्तावित आहेत.