
विविध विभागांच्या परवानग्याअभावी पाणीपुरवठा योजनांची कामे रखडणार
रत्नागिरी रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, खेड, चिपळूण, दापोली, गुहागर तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा योजनांची 410 कोटी 58 लाख रुपये खर्चाची 12 कामे प्रस्तावित आहेत. सन 2024 पर्यंत या योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य असले तरी वेगवेगळ्या विभागांच्या परवानग्या, जागा मालकांची आडकाठी आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी लागणार्या खोदाईचा खर्च अशा कारणांमुळे किमान 50 टक्के योजनांची कामे वेळेत पूर्ण होतील की नाही, याबाबत साशंकता आहे.
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीतील जयगड, मिर्या- शिरगाव -निवळी तिठा, राजापूरातील पांगरे बुद्रुक, संगमेश्वर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, चिपळूणातील ओवळी – कळकवणे – वालोटी, सावर्डे पाणीपुरवठा योजना, चिपळूण व खेडमधील वाशिष्ठी खोरे कोळकेवाडी ग्रॅव्हीटी प्रादेशिक योजना, दापोलीतील हर्णे, जालगाव ब्राम्हणवाडी, पालगड, बुरोंडी आणि गुहागर तालुक्यातील धोपावे पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. या सर्व योजना 410 कोटी 58 लाख 73 हजार रुपये खर्चाच्या असून निविदेची किंमत 291 कोटी 82 लाख 19 हजार रु. इतकी आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून योजनेची कामे जशी होतील तसा निधी मिळत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही कामे 2024 सालापर्यंत पूर्ण करण्याच्या शासनाकडून सूचना आहेत. परंतू या योजनांच्या कामांसाठी वेगवेगळ्या विभागाकडून आवश्यक असणार्या परवानग्या मिळताना अडचणी येत आहेत. अनेक खासगी जागांमध्ये कामांना अडथळा होत आहे. ज्या ठिकाणी रस्ते खोदून जलवाहिन्या टाकायच्या आहेत तो रस्ता पूर्ववत करण्यासाठी येणार्या खर्चाची अडचण आहे. अशा या कामांमुळे सन 2024 पर्यंत केवळ 6 ते 7 योजनांच्या कामांची पूर्तता होणे शक्य वाटत आहे.