
रत्नागिरी जिल्ह्यात २४० शासकीय वाहने भंगारात
रत्नागिरी :- केंद्र शासनाच्या ”स्क्रॅप” धोरणाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यानुसार १५ वर्षे आयुर्मान झालेली सर्व वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार ५६ खासगी वाहने भंगारात काढण्यात आली आहेत; मात्र २४० शासकीय वाहनांचे लिलाव करूनच ती स्क्रॅप करण्यात येणार आहेत; यासाठी योग्य बोली न लागल्याने लिलाव पुढे गेला आहे. त्यामुळे ही प्रक्रियाही पुढे गेली आहे.
देशभरातील अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये प्रचंड वायू प्रदूषण होत आहेत. त्यात जुन्या वाहनांच्या धुराची भर पडत आहे तसेच जुन्या वाहनांचा अधिक वापर वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या गोष्टींचा सारासार विचार करून केंद्र शासनाने १५ वर्ष आयुर्मान झालेली वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला मोठ्या शहरांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली. आता छोट्या शहरांमध्ये ती सुरू झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी १५ वर्षे झालेल्या शासकीय कार्यालयातील वाहने भंगारात काढण्याचे फर्मान काढले होते. त्यानुसार २४० शासकीय वाहन भंगारात निघणार आहेत तर ५६ खासगी वाहनेदेखील स्क्रॅपमध्ये काढली आहेत. शासकीय वाहनांमध्ये जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभागातील वाहनांचा समावेश आहे. १५ वर्षांपेक्षा जास्त वर्षे झालेली वाहने भंगारमध्ये काढली आहेत. जिल्ह्यातील ५६ खासगी वाहने मे महिन्यात भंगारात काढण्यात आलेली आहेत. ही प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार आहे. शासनाच्या आदेशानुसार १ मेपासून मुदतबाह्य वाहने भंगारमध्ये काढण्यात येत आहेत. ही वाहने लिलाव पद्धतीने भंगारात दिली जाणार आहेत; परंतु बोली कमी झाल्याने फेरलिलाव होणार आहे.