
जिल्ह्यातील चार कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
रत्नागिरी:- खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. जिल्ह्यात ज्या कृषी केंद्रांवर नियमांचे पालन केले जात नाही त्यांच्यावर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाकडून कारवाई केली. जिल्ह्यातील चार कृषिसेवा केंद्राचे परवाने निलंबित केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात व नागली ही पिके खरीप हंगामात घेतली जातात. चालू खरीप हंगामात पीक उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांचे नियोजन केले आहे. त्यानुसार आवश्यक खत, बियाणे व औषधे बाजारामध्ये उपलब्ध झाली आहेत. या निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात १० भरारी पथक स्थापन केली आहेत. यामध्ये २९ अर्धवेळ निरीक्षक कार्यरत आहेत. या निरीक्षकांमार्फत जिल्ह्यात परवानाधारक कृषिसेवा केंद्राची तपासणी सुरू केली आहे. तपासणीमध्ये काही कृषिसेवा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टॉक रजिस्टर न ठेवणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागावर न लावणे, वेळेत परवाने अद्ययावत न करणे, शेतकऱ्यांना बिल न देणे अशा त्रुटी आढळून आल्या आहेत तसेच परवाना काढला; पण कोणताही व्यवसाय केला जात नाही, या बाबी तपासणीत सापडल्या आहेत. त्यामुळे त्या परवानाधारक कृषिसेवा केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये रत्नागिरी १, राजापूर १, चिपळूण २ केंद्रांचा समावेश आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सुनंदा कुर्हाडे व गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक सागर साळुंखे यांनी केली.
बियाणे कायद्याचे पालन करा
३५ टन खतापेक्षा अधिक साठा करण्यास बंदी आहे. बियाणे कायदा १९६६, खत नियंत्रण आदेश १९८५ व कीटकनाशके कायदा १९६८ मधील तरतुदीचे पालन करून तपासणी पथकाला नियमानुसार सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत व होणारी कारवाई, होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुर्हाडे यांनी केले आहे.