
कुवारबावमध्ये अनधिकृत बांधकाम हटविण्याचा फार्स
रत्नागिरी:- कुवारबावमधील ते अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी तहसील कार्यालयाचे पथक बुधवारी सकाळी त्या ठिकाणी आले अन् काही वेळात गेलेही..फक्त अनधिकृत बांधी भोवती असलेले पाईप काढले गेले, मूळ अतिक्रमण जैसे थे आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याबाबत गेल्या पाच महिन्यांपासून चालढकल होत असल्याचा आरोप करतानाच ग्रामस्थानी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
बुधवारी ३१मे रोजी कुवारबाव येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी तहसीलदार रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडून अतिक्रमण हटवणारे पथक कुवारबाव येथे पोलीस प्रोटेक्शनसहित दाखल झाले होते. पण ते अनधिकृत चिरे बांधी बांधकाम आज सरकारी कर्मचाऱ्यांना पाडता आले नाही. त्या ठिकाणी एका पक्षाचे पदाधिकारी तसेच अन्य ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी उपस्थितीत होते. त्यांनी पत्रकारांसमोर सरकारी अधिकाऱ्यांना कागद पत्रांच्या फाईल दाखवत अनेक प्रश्न विचारले. शेवटी अतिक्रमण न पाडताच जे सी बी तेथून हलविण्यात आला. फक्त अतिक्रमणावरील लोखंडी रेलिंग अतिक्रमणकर्त्यांनी स्वतः काढून घेतल्याचे सांगण्यात येते. ही सरकारी जागा ग्राम पंचायतीने ताब्यात घ्यावी पण तोडू नये, अशी चर्चा होती. कोणतीही परवानगी नसताना सरकारी जागेवरील अतिक्रमण हटविले जाऊ नये, यासाठी आटापिटा सुरू होता.
तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रात रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गालगत ग्रामपंचायत कमानी शेजारी तथाकथित स्पोर्ट्स क्लबने गेले वर्षभर ताबा घेऊन त्यावर अनधिकृत रित्या चिरे बांधी केले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५० नुसार रत्नागिरीचे तत्कालीन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी अतिक्रमण कर्त्याना अतिक्रमण हटविण्याची नोटीस ७ फेब्रुवारी २०२३ च्या पत्राने बजावली होती. वारंवार नोटीस देऊनही अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे २२६ जणांना तहसील कार्यालयाने नोटीस धाडली होती. अतिक्रमण हटविण्यात येईपर्यंत दर दिवशी दंडाची रक्कम ठरविण्यात आली होती. त्यामुळे किती दंड आकारण्यात आला, आणि अतिक्रमण हटविणार कधी, याची माहितीही तहसीलदार कार्यालयाने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.