
भाजपकडून कृतज्ञता मासचे आयोजन: प्रमोद जठार
रत्नागिरी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या सत्ताकाळात देशात अनेक विधायक कामे झाली आहेत. त्याची माहिती लोकांपर्यंत देण्यासाठी कृतज्ञता मासचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे नेते व लोकसभा संयोजक प्रमोद जठार यांनी दिली. पंतप्रधानांमुळेच गतवेळी या लोकसभा मतदार संघात युतीचे उमेदवार म्हणून खासदार विनायक राऊत निवडून आले. परंतु येथील उमेदवार चुकला असल्याची कबुलीही प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दक्षिण रत्नागिरी भाजपाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमोद जठार म्हणाले की, गतवेळी मोदी लाटेमध्ये विनायक राऊत हे निवडून आले. त्यावेळी आमचा युतीचा उमेदवार चुकलाच, केंद्राने मतदार संघात कोट्यवधीची विकास कामे केली आहेत. मागील नऊ वर्षात विनायक राऊत यांचे मतदार संघाच्या विकासाचे योगदान दाखवा असे आव्हानही त्यांनी दिले.
यावेळी बोलताना जठार म्हणाले की, मागील नऊ वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक योजना अंमलात आणल्या, अनेक उपक्रम राबवले. या प्रगती पुस्तकाचा आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाने केलेल्या कामाची माहिती घराघरात पोहचवण्यासाठी कृतज्ञता मासचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी विविध पदाधिकार्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्ह्यात अडीचशे कार्यकर्त्यांची टीम तयार करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यकर्ता 25 घराघरात भेटी देणार आहे. बुथवरती लाभार्थ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुध्दीवंतांचे मेळावे, व्यापारी, सोशलमिडियासह प्रत्येक टप्प्यात नागरिकांच्या भेटी घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारवर विश्वास ठेवल्याबद्दल घरोघरी जाऊन नागरिकांचे आभार मानले जाणार आहेत. याची जबाबदारी माजी आमदार बाळ माने यांच्यावर असल्याचेही जठार यांनी स्पष्ट केले.